Advertisement

'हा नारायण राणे बाळासाहेबांनी या राज्याला दिला'


SHARES

बाळासाहेबांनी नारायण राणेंसारखा सामान्य माणूस या राज्याला दिला असे उद्गार माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काढले आहेत. तसेच भाजपाचे केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत आपली वेगळ्या प्रकारची मैत्री असल्याचंही नारायण राणे म्हणाले. नारायण राणे यांचा रविवारी 65 वा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात नारायण राणे बोलत होते. रवींद्र नाट्य मंदिर सभागृहामधील या कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते सोडून सर्व पक्षातील नेते उपस्थित होते. या वेळी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निबांळकर, माजी अर्थमंत्री जयंत पाटील, माजी खासदार एकनाथ गायकवाड, आमदार कालीदास कोळंबकर यांनी उपस्थिती नोंदवली.

बाळासाहेबांचं नारायण राणेंवर विशेष प्रेम होतं - नितीन गडकरी

बाळासाहेबांचं नारायण राणेंवर विशेष प्रेम होते. शिवसेना सोडू नये यासाठी आपण शेवटपर्यंत नारायण राणेंच्या बंगल्यावर होतो. नारायण राणे यांच्यावर शिवसेनेमधून कितीही टीका झाली, तरी नारायण राणे यांनी बाळासाहेबांवर टीका केली नाही. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की, नितीन तू शिवसेनेत ये आणि प्रमोद नवलकर, डाके आणि इतर नेत्यांना भाजपात जाऊन दे. ते शिवसेनेच्या लायकीचे नाहीत आणि राणे भाजपाच्या लायकीचा नाही असं बाळासाहेब म्हणत असल्याचं या वेळी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी म्हणाले.

नारायण राणे काही वेडावाकडा निर्णय घेणार नाहीत - सुशीलकुमार शिंदे

नारायण राणे विचार करून काम करणारे आहेत. माणसे कशी जोडावीत हे नारायण राणे यांना माहीत आहे. नारायण राणे काही वेडावाकडा निर्णय घेणार नाहीत. सध्या बेस्टची परिस्थिती खालावलेली आहे. मात्र नारायण राणे यांनी त्यावेळी बेस्टला फायद्यात आणली होती. राणे हे आक्रमक असले तरी घरी पत्नीसमोर गरीब गाय असतात, अशा शब्दांत काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांनी भावना व्यक्त केल्या.

नारायण राणेंनी दिलेले कपडे घालून अर्थसंकल्प मांडला - जयंत पाटील

अर्थसंकल्प मांडताना नारायण राणे त्या अर्थसंकल्पाची चिरफाड करायचे. त्यामुळे खूप वाईट वाटायचे. आयपीएलच्या मॅचेस सुरू होणार होत्या. तेव्हा अर्थसंकल्पावर कोणाचं लक्ष नसणार म्हणून विधानसभा अध्यक्षांना अर्थसंकल्प काही तास अगोदर मांडण्याची परवानगी मिळावी यासाठी संपर्क केला होता. मात्र त्यावेळी त्यांनी त्यांच्या शेजारी असलेल्या विरोधी पक्ष नेते नारायण राणेंकडे फोन दिला. तेव्हा त्यांनी अनुमती दिली. त्याचसोबत योगायोगाने कोणते कपडे उद्या घालणार आहात, याबद्दल त्यांनी विचारले. मात्र आपण वजन कमी केले म्हणून आपल्याकडे आता घालण्यासाठी योग्य कपडे नसल्याची व्यथा त्यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी नारायण राणे यांच्याकडे मांडली होती. त्यानंतर काही वेळात त्यांनी विधानभवाच्या जयंत पाटील यांच्या कार्यालयात टेलरला माप घेण्यासाठी पाठवले आणि अर्थसंकल्पाच्या दिवशी 11 वाजता गब्बाना कंपनीचे कपडे जयंत पाटील यांच्यापर्यंत पोहोचल्याचा किस्सा यावेळी जयंत पाटील यांनी सांगितला. तसंच आपण राष्ट्रवादी पक्षाचे गटनेता असलो तरी आपली काँग्रेसवर नजर असल्याचंही ते म्हणाले.

तुम्ही तुमचा रुबाब घालवू नका- रामराजे नाईक-निंबाळकर

नारायण राणे कुठेही राहा मात्र तुमचा रुबाब घालवू नका असं वक्तव्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा