महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब (balasaheb thorat) थोरात लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चांनी राज्यातील राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. यावर तर्कवितर्क लढवले जात असतानाच दिल्लीतील काँग्रेसश्रेष्ठींसोबत बातचीत केल्यानंतर राजीनाम्याच्या चर्चांवर बाळासाहेब थोरात यांनी मौन सोडलं आहे.
एका वृत्तवाहिनीशी यासंदर्भात बोलताना बाळासाहेब थोरात यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, माझा दिल्ली दौरा आणि राजीनाम्याचा काहीही संबंध नाही. विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी मी दर महिन्याला दिल्लीत जातो. त्याप्रमाणे यंदाही गेलो होतो. परंतु माझ्या मागे महाराष्ट्रात राजीनाम्याच्या बातम्या पसरल्या, त्याची माहिती मला दिल्लीतच मिळाली. माझ्याकडे सध्या काँग्रेसचं (congress) प्रदेशाध्यक्ष, विधीमंडळ नेता आणि महसूल मंत्रीपद अशा तीन जबाबदाऱ्या आहेत. या जबाबदाऱ्या सांभाळतानाच माझ्यावर पक्षाला आणखी काही जबाबदारी द्यायची असेल, तर माझी हरकत नाही, असं मी महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांना सांगितलं होतं. एवढंच नाही तर माझ्याकडील जबाबदाऱ्यांचं विभाजन करायचं असल्यास त्यालाही माझी तयारी असेल, असं आधीच स्पष्ट केलं होतं.
हेही वाचा- बाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार?
माझ्याकडील जबाबदाऱ्यांपैकी काही जबाबदाऱ्या इतरांमध्ये वाटून द्याव्यात, असं जर पक्षाला वाटत असेल आणि त्या दृष्टीने प्रक्रिया सुरू झाली असेल, तर त्याचं मी स्वागतच करतो. मला कुठल्याही प्रकारची अडचण नाही. पक्षाने तरुण, धडाडीच्या, राज्यभर फिरून काँग्रेसला पुढे नेण्यास सक्षम असलेल्या व्यक्तीला निवडावं. त्यासाठी मी कोणाचंही नाव पुढे करणार नाही. तो निर्णय सर्वस्वी पक्षाचा असेल, असंही बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं.
(balasaheb thorat clarifies over rumors of resignation of maharashtra congress president post)
हेही वाचा- भाजपमधून मोठ्या प्रमाणात घरवापसी होणार- बाळासाहेब थोरात