भीमा-कोरेगाव प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार अाहे. या प्रकरणातील दोषींवर निश्चितच कारवाई केली जाईल, असं अाश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास अाठवले यांच्या शिष्टमंडळाला दिलं. रामदास अाठवले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं शनिवारी सकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात अाली.
भीमा कोरेगाव येथील वढू बुद्रूक परिसरातील घटनाक्रमाबाबत केंद्रीय राज्यमंत्री अाठवले यांनी मुख्यमंत्र्यांशी विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने चर्चा केली. परिस्थिती चिघळवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावी तसंच बंदच्या काळात निरपराध लोकांवर करण्यात अालेली कारवाई मागे घेण्यात यावी, अशी मागणी अाठवले यांनी फडणवीस यांच्याकडे केली.
या प्रकरणाची पाळेमुळे खोदण्याचा निर्धार आहे. त्यासाठी सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर निश्चितच कारवाई केली जाईल. नाहक नुकसान झालेल्यांनाही मदत करण्याचा प्रयत्न राहील. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी वारंवार आढावा घेतला जात आहे. बंदच्या काळात परिस्थिती बिघडविणाऱ्यांवर कारवाई होईलच. पण नाहक कुणावरही कारवाई होऊ नये, अशी काळजी घेतली जाईल.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री