कोरोना विषाणूला अटकाव घालण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे (lockdown) देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आलेली असताना माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj chavan) यांनी केंद्राला मोलाचा सल्ला देऊ केला आहे. सरकारनं ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये (gold in temples) पडून असलेलं सोनं कर्जानं ताब्यात घेण्याची सूचना चव्हाण यांनी केली आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागू शकेल, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
सोनं पडून
केंद्र सरकारनं ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेलं सोनं कर्जानं ताब्यात घ्यावं. जागतिक सोनं परिषदेच्या अंदाजानुसार देशात १ ट्रिलियन डॉलर (७६ लाख कोटी रुपये) इतकं सोनं आहे. सरकारनं हे सोने १ किंवा २ टक्के व्याजानं परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावं, असा सल्ला पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारला दिला आहे.
याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाचा नारा देत देशासाठी २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. पृथ्वीराज चव्हाण यांनी या घोषणेचं स्वागत केलं होतं.
हेही वाचा - कष्टकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ७५०० रुपये टाका, अशोक चव्हाणांची केंद्राकडे मागणी
#Stimulus @PMOIndia सरकारने ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे. #WorldGoldConcil च्या अंदाजानुसार देशात १ ट्रिलियन डॉलर (किंवा ७६ लाख कोटी रुपये) इतके सोने आहे. सरकारने हे सोने १ किंवा २ टक्के व्याजाने परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावे.
— Prithviraj Chavan (@prithvrj) May 13, 2020
७५०० रुपये द्या
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक पॅकेजवर भाष्य करताना अशोक चव्हाण म्हणाले, आत्मनिर्भर भारतासाठी मागणी व पुरवठ्याची साखळी मजबूत करण्याची गरज पंतप्रधानांनी विषद केली. त्यानुसार आजच्या ठप्प अर्थव्यवस्थेत मागणी वाढवायची असेल तर काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या सूचनेनुसार देशातील सर्व कष्टकऱ्यांच्या खात्यात किमान ७,५०० रूपये जमा करण्याचा निर्णय केंद्राने तातडीने जाहीर केला पाहिजे, अशी मागणी केली आहे.
काय म्हणाले मोदी?
मोदी यांनी स्वावलंबी भारत मोहिमेअंतर्गत देशवासियांसाठी विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली. गेल्या काळात दिलेल्या पॅकेजशी हे पॅकेज जोडल्यावर भारताच्या जीडीपीच्या १० टक्के म्हणजेच जवळपास २० लाख कोटी रुपयांचं हे पॅकेजे आहे, असं ते म्हणाले. देशासाठी दिवसरात्र झटणारे शेतकरी, लघू, मध्यम उद्योग, मजुरांसाठी तसंच प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी पॅकेज आहे, असं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं.
भारतासाठी मोठी संधी
एका व्हायरसने जगाला उद्धवस्त केलं आहे. जगातील कोट्यवधी लोकं कोरोना संकटाचा सामना करत आहेत. हे संकट कल्पनेपलिकडचं आहे. कोरोना संकटाच्या आधीचं जग आपण पाहिलं आणि नंतरचं जगंही आपल्याला पाहायचं आहे. गेल्या शतकापासून २१ वं शतक भारताचं असल्याचं आपण ऐकत आहोत. २१ वं शतक भारताचं व्हावं, हे आपलं स्वप्न नाही तर जबाबदारीही आहे. जगाची आजची स्थिती पाहता आत्मनिर्भर भारत हाच एकमेव मार्ग आहे, असं मोदी म्हणाले.