कोरोनाचा फैलाव वेगानं होत आहे. मात्र, तरीही लोक सरकारच्या सूचनांचं पालन करत नाहीत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सुशिक्षित लोकच बेजबाबदारपणे वागत आहेत, हे दुर्दैव आहे. भाजीसाठी गर्दी करू नका, अन्यथा भाजीपाला मार्केटही बंद करावं लागेल, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.
कोरोनाचा पार्श्वभूमीवर सरकारनं राज्यात संचारबंदी लागू केली आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात साथीचा प्रसार होऊ नये म्हणून जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. जमावबंदीही लागू करण्यात आली आहे. त्यानंतरही अनेक ठिकाणी लोक गर्दी करताना दिसत आहेत. लोकांकडून नियमांचं पालन होताना दिसत नाही. त्यामुळे अजित पवार यांनी पुन्हा एकदा जनतेला सरकारच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.
पुण्यात सुरुवातीला जे जोडपं कोरोनाबाधित आढळलं होतं. त्यांचा आज दुपारी दुसरा अहवाल येणार आहे. त्यांच्याबातीत दिलासा देणारी बातमी येईल अशी अपेक्षा आहे. मात्र, तरीही कुणीही गाफील राहता कामा नये. भाजीपाला मार्केटमध्ये आजही गर्दी होताना दिसतेय. भाजीपाल्याचा पुरवठा सुरूच आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. गर्दी करू नका,'अशी विनंती त्यांनी केली.
हेही वाचा