भाजपकडून काढण्यात येत असलेली जन आशीर्वाद यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली.
जनतेशी संवाद साधण्याच्या उद्देशाने भाजपने राज्याच्या वेगवेगळ्या भागात १६ ऑगस्टपासून जन आशीर्वाद यात्रा काढण्यात येत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील नारायण राणे, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड आणि कपिल पाटील या चार नवनियुक्त मंत्र्यांवर जनआशीर्वाद यात्रा यशस्वी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न असल्याचं भाजपचं म्हणणं असलं, तरी यातून होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनासंबंधीत नियमांचं उल्लंघन होत असल्याचा सत्ताधारी पक्षाचा आरोप आहे. यावरून आता राजकारणही रंगायला लागलं आहे.
त्यातच ठाणे शहरात सोमवारी कपिल पाटील यांनी परवानगी न घेताच जन आशीर्वाद यात्रा काढल्याचं समोर आल्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यात्रेमध्ये कोरोना नियमांचं उल्लंघन झाल्याची नोंद या गुन्ह्यामध्ये करण्यात आली.
हेही वाचा- राज्य सरकारचा मोठा निर्णय, अतिवृष्टीसह पूरबाधित व्यावसायिकांना ५ ते ६ टक्के
यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, जन आशीर्वाद यात्रा ही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. सध्या ज्या प्रकारच्या गर्दीचं तुम्ही शक्तीप्रदर्शन करताय हे एक प्रकारे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचा इशारा दिला आहे. राज्याला अडचणीत आणण्यासाठी आपण हे मुद्दाम करताय. ठीक आहे. पण किमान तुम्ही संयम पाळा, असं सजय राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आम्ही कोरोनासंबंधीचे सगळे नियम, कायदे पाळूनच जन आशीर्वाद यात्रा काढत आहोत. यात्रेच्या माध्यमातून आम्ही फक्त लोकांना भेटतोय. मुख्यमंत्री स्वत: सुद्धा जनतेच्या आशीर्वादानेच सत्तेत बसलेत. तेही आडमार्गाने. निवडून आलेले नाहीत. त्यामुळं आम्हाला कोणी उपदेश देण्याची गरज नाही, असा टोला केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांनी लगावला.