कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून देशभरात लाॅकडाऊन करण्यात आलं आहे. रस्त्यावर येण्यास, गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत सर्वधर्मियांनी कायद्याचं पालन करत आपापले सण-समारंभ घरातच साजरे केले. असं असताना संचारबंदी मोडून रमझानसाठी रस्त्यावर येण्याची सूट का दिली जाते? असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
राज्यपालांचं राजकारण चुकीचं
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, आज महाराष्ट्र देश कोरोनाशी झुंजत असताना राज्यपाल जे काही राजकारण करत बसलेत ते चुकीचं आहे, राज्यपालांच्या आडून जे राजकारण करत असतील त्यांना पण हेच सांगणं आहे की हे चुकीच आहे.
हेही वाचा - महाराष्ट्रावर संकट येताच परप्रांतीय पळ काढतात, आपल्या मराठी तरूणांना संधी द्या- राज ठाकरे
नोकरशाहीचा दबाव घेऊ नये
कोरोनाचं संकट अभूतपूर्व आहे. त्यामुळे केंद्र, राज्य गोंधळलं होतं हे मान्य. पण आता ह्यापुढे सरकारने नोकरशाहीचा दबाव न घेता, आकड्यांच्या अधीन न जाता, वस्तुस्थिती समजून घेऊन निर्णय घ्यावेत. तसंच हिंदूंनी जर सण घरात साजरे केले तर मग रमझानसाठी रस्त्यावर येण्याची सूट का दिली जाते?
#राजठाकरे #महाराष्ट्रधर्म #महाराष्ट्रदिन #मनसे #RajThackeray #MaharashtraDharma #maharashtraday pic.twitter.com/lSpdMbNTKl
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) May 2, 2020
महाराष्ट्राच्या तरूणाईत क्षमता
महाराष्ट्रात बंडखोरी विचारांचा, शौर्याचा, विवेकाचा प्रवाह गोठला आहे. महाराष्ट्र जातीपातीच्या चिखलात रूतलाय, महापुरुष सुद्धा आपण जातीत अडकवून टाकले, मराठी समाज एकत्र येऊ नये म्हणूनदेशभरातील श्राद्धाचे कावळे टपून बसलेत.
इथल्या तरुणाईने आपलं राज्य कसं मोठं करता येईल ह्याच स्वप्न बघावं. महाराष्ट्राची ताकद महाराष्ट्राने गमावता कामा नये. अटकेपार झेंडे फडकविणारा महाराष्ट्र आज सामाजिक-राजकीयदृष्ट्या गलितगात्र झालाय. त्या महाराष्ट्राने आता लॉकडाऊनचा काळात पुन्हा झेपावण्यासाठी विचार करावा.
महाराष्ट्राच्या तरुणाईमध्ये संपूर्ण क्षमता आहे, गरज आहे फक्त त्यांना पाठबळ देण्याची. महाराष्ट्राचं तेज पुन्हा येवो. महाराष्ट्र आजवर ज्या क्षेत्रात अग्रेसर होता त्या क्षेत्रात पुन्हा अग्रेसर व्हावा आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राने देशाला विचार द्यावा.