छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचं भूमिपूजन करून दोन वर्षे झाली आणि देशाच्या घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं भूमिपूजन होऊन ३ वर्षे झाली. तरीही या स्मारकांच्या कामांना सुरूवात झालेली नाही. त्यामुळे ही स्मारके नेमकी होणार तरी कधी? असा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने उपस्थित केला.
‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ परिषदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरबी समुद्रातील शिव स्मारक लवकरच उभारण्याचं आश्वासन दिलं. पण त्यात फार आश्वासकता दिसली नाही. दुसऱ्या दिवशी शिवजयंती आहे आणि आज आपण महाराष्ट्रात आहोत, याचा विचार करत त्यांनी आपल्या भाषणात शिवस्मारकाचा उल्लेख केला. परंतु, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मीलच्या जागेवरील नियोजित स्मारकाबद्दल ते काहीच बोलले नाहीत. या दोन स्मारकांच्या मुद्द्याचा वापर भाजपाचे सरकार फक्त राजकारणासाठी करत आहे. निवडणूक जवळ आली की, त्यांना या स्मारकांची आठवण येते, असा आरोपही त्यांनी केला.
पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांची छायाचित्रे असलेल्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’च्या जाहिरातीचे फलक लावण्यासाठी या सरकारने शिवाजी महाराजांच्या अॅनिमेशन मुव्हीचे फलक उतरविल्याची बातमी दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाली होती. खाली उतरविलेल्या फलकांवर शिवाजी महाराजांचे मोठे छायाचित्र होते. आपल्या जाहिरातीसाठी हे सरकार शिवाजी महाराजांची छायाचित्र असलेले कायदेशीर फलक खाली उतरवते, हे महाराष्ट्राचे दुर्दैव असून, या सरकारलाच आता सत्तेतून खाली उतरवलं पाहिजे, असं विखे पाटील म्हणाले.