राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मेट्रो ३ कारशेडसाठी ठरवण्यात आलेल्या कांजूरमार्ग येथील नव्या जागेची बुधवार १४ आॅक्टोबर रोजी पाहणी केली. यासंबंधीची माहिती त्यांनी स्वत:च ट्विटरवरून दिली. तीन दिवसांपूर्वीच म्हणजेच रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो कारशेड वादग्रस्त आरेतील जागेवरून कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला होता. (maharashtra environment minister aaditya thackeray visited the kanjurmarg plot handed over to MMRDA for the metro car depot)
याबाबत अधिक माहिती देताना आदित्य ठाकरे यांनी सांगितलं की, आज सकाळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (MMRDA) ला कारडेपोसाठी हस्तांतरीत करण्यात आलेल्या कांजूरमार्ग येथील प्लाॅटची पाहणी सीएमओ (CMO), एमएमआरडीए (MMRDA) आणि एमएमआरसीएल (MMRCL) च्या अधिकाऱ्यांसोबत केली. याठिकाणी मेट्रो ३ आणि मेट्रो ६ चे कारडेपो बनविण्यात येतील. जेणेकरून नव्या आराखड्यासोबत येथील कनेक्टिव्हिटीत देखील वाढ होईल. माती परिक्षणाचं काम आधीच सुरू झालेलं आहे. त्यांच्यासोबत मी देखील प्लाॅटची पाहणी केली.
जनतेशी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधताना आरे काॅलनीतील वादग्रस्त मेट्रो कारशेड हलवून कांजूरमार्ग येथील शासकीय जमिनीवर नेण्यात येणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवार ११ आॅक्टोबर रोजी केली होती. विशेष म्हणजे यासाठी शून्य खर्च येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा - मेट्रो कारशेड हलवल्यामुळे ‘इतका’ खर्च वाया?
This morning, officials of CMO, MMRDA, MMRCL visited the Kanjurmarg plot handed over to MMRDA for the car depot. Metro line 3 & 6 car depots will be made here and increase connectivity with the revised plan. Soil testing has begun already. I joined them to see the plot. pic.twitter.com/lpUDMy2TFN
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 14, 2020
आरे कारशेडला माझा विरोध होताच. तशी भूमिकादेखील मी मांडली होती. म्हणूनच आरेतील जंगलासाठी आंदोलन करणाऱ्या पर्यावरणवाद्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारने नुकतीच आरेतील ६०० एकर जमीन जंगल म्हणून घोषित केली आहे. त्यामुळे या जंगलाची व्याप्ती आता ८०० एकर झाली आहे. आरेतील वनसंपदेचं संरक्षण करण्याचा दुसरा टप्पा म्हणून आरेतील कारशेड दुसरीकडे स्थलांतरित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आरेतील कारशेड आता कांजूरमार्ग इथं करण्यात येणार आहे. ही जमीन सरकारची आहे. त्यामुळे जमिनीसाठी एक पैसाही द्यावा लागणार नाही. जनतेचा पैसा वापरण्यात येणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
तर दुसऱ्या बाजूला आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग इथं हलविण्याचा राज्य सरकारचा निर्णय दुर्दैवी आणि अहंकारातून घेतलेला आहे. कांजूरमार्गला मेट्रो कारशेड नेल्यास ४ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागेल, असं याच सरकारने स्थापन केलेल्या समितीने सांगितल्याची माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.