मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आलं. या लॉकडाऊनमुळं मुंबईची लाइफलाइन लोकल सेवा बंद करण्यात आली. मात्र ही लोकल सेवा केवळ सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद केली असून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू आहे. त्यामुळं, कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना बेस्ट बस, एसटी व खासगी वाहतुकीचा वापर करून प्रवास करावा लागत आहे. परिणामी बेस्ट प्रवास करताना प्रवाशांना मोठ्या त्रासांना सामोरं जावं लागतं आहे. त्यामुळं या सर्वसामान्य प्रवाशांची गैर सोय होऊ नये यासाठी रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी करणाऱ्या मनसेनं सविनय कायदेभंग करत, सोमवारी लोकल प्रवास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मनसेेच्या या आंदोलनाला रेल्वे पोलिसांनी कायदेशीर कारवाईची ताकीद दिली असली, तरी मनसे त्यांच्या आंदोलनावर ठाम आहे.
मनसेच्या या आंदोलनाला उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संघानेही त्यांना पाठिंबा दिला आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी रेल्वे सुरू करण्याच्या मागणीसाठी सोमवारी सविनय कायदेभंग आंदोलन करणार असल्याचे याआधीच स्पष्ट केलं आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी संदीप देशपांडे यांना आंदोलन न करण्याची नोटीसद्वारे सूचना केली आहे. आंदोलन केल्यास नियमानुसार कारवाई करणार असल्याचेही रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र रेल्वे पोलिसांची नोटीस आली असली, तरी सोमवारी आंदोलन होणार असल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले आहे.
जनतेच्या हितासाठी सविनय कायदे भंग, जनतेच्या हितासाठी मनसेचा रेल्वे प्रवास pic.twitter.com/S1iPqFfBHD
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 19, 2020
कायदेशीर कारवाईला आम्ही तयार आहोत. शिवसेनेची आंदोलन झाली, त्यांना नोटीसा पाठवल्या नाहीत, मात्र आम्हाला लगेच नोटीस देण्यात आली, ही दडपशाही असल्याचेही देशपांडे यांनी म्हटलं. ८ तास ड्युटी आणि ८ तास प्रवास असे लोकांचे हाल सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांना दिसत नाही का, परिवहन मंत्री अनिल परब हे एसटी १०० टक्के प्रवाशांसह चालू करत आहेत.
कोरोनाने अनिल परब यांच्या कानात सांगितले आहे का की, एसटी सुरू झाल्यास करोना पसरणार नाही आणि रेल्वे सुरू झाल्यास होणार, असा सवालही त्यांनी केला.