नव्या वर्षात मनसे नव्या जोमानं कामाला लागली खरी. पण एखाद्या चांगल्या कामात अडथळे येतातच. तसंच काहीसं मनसेच्या बाबतीत झालं आहे. मनसेची ओळख असलेला झेंडा लवकरच बदलण्यात येणार आहे, हे सर्वांनाच माहित आहे. पण, हा झेंडा प्रसिद्ध होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मनसेच्या या नव्या झेंड्याला संभाजी ब्रिगेडनं विरोध केला आहे.
नवीन भगवा झेंडा निर्माण करून मनसेनं त्यावर ‘राजमुद्रा’ छापलेली आहे. याला संभाजी ब्रिगेडनं विरोध केला आहे. "छत्रपती शिवाजी महाराजांची ‘राजमुद्रा’ ही राजकारण करण्याचं साधन नाही. स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमुद्रेची निर्मिती केलेली आहे. कुठल्याही पक्षांनी त्या राजमुद्रेचा वापर राजकारण करण्यासाठी करू नये,” असं म्हणत संभाजी ब्रिगेडनं विरोध केला आहे.
संभाजी ब्रिगेडनं राज्याचे निवडणूक आयोग, छत्रपती यांचे वंशज आणि महाराष्ट्र सरकार यांच्याकडेही या झेंड्या विरोधात आणि तक्रार करणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे. "भारतीय संविधान आणि लोकशाही मानणारे आम्ही आहोत. भगवा झेंडा हा समता आणि बंधुतेचा प्रतीक असून तथागत बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज शांतीचे सुद्धा प्रतिक आहे. त्यांनी तेच स्वीकारावं, हिंदुत्वाची झालर त्यांनी पांघरू नये," असं मत संभाजी ब्रिगेडनं मांडलं आहे.
सध्याच्या मनसेच्या झेंड्यात निळा, भगवा, पांढरा आणि हिरवा असे रंग आहेत तर मध्ये पक्षाचं चिन्ह असलेलं इंजिन आहे. नव्या झेंड्यात सर्व चारही रंग जाणार असून फक्त भगवा रंग असणार आहे आणि मध्यभागी 'शिवराजमुद्रा' असणार आहे. हा बदल म्हणजे मनसेची हिंदुत्वाकडे असलेली वाटचाल असल्याचं म्हटलं जातंय.
२३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. यादिवशी मनसेचं महाअधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनात राज ठाकरे पक्षाला नवी दिशा देण्यावर कार्यकर्त्यांना उभारी देणार आहे.
हेही वाचा