मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता मराठा क्रांती मोर्चा अधिकच आक्रमक झाला आहे. सोमवारी मराठा क्रांती मोर्चाने गनिमीकाव्याने मुंबईत धकडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अनेक कार्यकर्ते भूमिगत झाले असून पुणे, औरंगाबाद, नांदेड, नाशिक अन्य भागातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. दरम्यान मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकाशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचं चित्र आहे.
आरक्षणावर केवळ आश्वासन मिळत असून सरकार योग्य ती माहिती न देता संभ्रमच निर्माण करत आहे. विधानसभेत कायदा करण्याची प्रक्रिया होताना दिसत नाही, असं म्हणत मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. त्यामुळेच आता मराठा क्रांती मोर्चाने 'करो या मरो' म्हणत वाहन मोर्चाद्वारे मुंबईत धडकण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्याच्या विविध भागातून आंदोलक मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. दुपारपर्यंत मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थचा प्रश्न निर्माण होणार असून खबरदारी म्हणून राज्याच्या विविध भागातून आंदोलकांची धरपकड सुरू आहे.
मुंबईतून ही आंदोलकानाही अटक होण्याची शक्यता आहे. सरकारने ठोस पाऊल उचलल्याशिवाय माघार नाही, अशी भूमिका आंदोलकाची आहे. त्यामुळे सोमवारचा दिवस आता अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.