Advertisement

‘या’ पक्षाच्या जन्मानंतर महाराष्ट्रात दुसऱ्यांच्या जातीबद्दलचा द्वेष वाढला- राज ठाकरे

दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष वाटणं आणि त्याबद्दल आरडाओरडा करणं याआधी महाराष्ट्रात होतं नव्हतं. हे गेल्या २०-२५ वर्षांपासून सुरु झालं.

‘या’ पक्षाच्या जन्मानंतर महाराष्ट्रात दुसऱ्यांच्या जातीबद्दलचा द्वेष वाढला- राज ठाकरे
SHARES

महाराष्ट्रात जात ही गोष्ट आधीपासूनच होती. मात्र, स्वजातीचा अभिमान इतपतच ती मर्यादित होती. आत मात्र जात ही नेत्यांची ओळख झाली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच जातीचा मुद्दा हा सर्वार्थाने मोठा झाला. जेम्स लेनला मराठा तरुण-तरुणींपर्यंत कुणी पोहोचवलं?, असा प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर (ncp) थेट आरोप केला.

एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील राजकारणावर परखडपणे भाष्य केलं. ते म्हणाले, महाराष्ट्रात जाती आधीपासून होत्याच. प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल अभिमान होता. जातीवर आजही मतदान होतं. मात्र सध्या महाराष्ट्राच दुसऱ्याच्या जातीबद्दलचा द्वेष वाढत चालला आहे. दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष वाटणं आणि त्याबद्दल आरडाओरडा करणं याआधी महाराष्ट्रात होतं नव्हतं. हे गेल्या २०-२५ वर्षांपासून सुरु झालं. हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चेहऱ्याला डाग लावणारं आहे. 

हेही वाचा- शरद पवारांच्या आवाजात मंत्रालयात फोन करणाऱ्या एकाला अटक

महाराष्ट्रात मराठी बोलणारे लोकं जसी आपली भाषिक आणि प्रादेशिक अस्मिता जपून आहेत, तशीच तामिळ, गुजराती, बंगाली बोलणारे लोकं आपापल्या राज्यात अस्मिता बाळगून आहेत. भाषा आणि त्यातून निर्माण होणारी संस्कृती देश निर्माण होण्याच्याही आधीपासूनच आहेत, हे आपण आधी लक्षात घेतलं पाहिजे. एखादी भाषा आणि संस्कृती दुसऱ्यांवर लादण्यासाठी दुसऱ्या भाषेला किंवा लोकांना कमजोर करणं योग्य नाही. किती वर्ष उत्तर आणि दक्षिणेत सुरु असलेला संघर्ष आपण पाहिला आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण असा भारत आजपर्यंत आपण पाहत आलो असून त्यातूनच या गोष्टी बिघडल्या आहेत, यावर राज ठाकरे (raj thackeray) यांनी बोट ठेवलं.

देशाच्या विकासात लोकसंख्या एक महत्वाचा अडथळा ठरत असून ती नियंत्रणात आणण्याची गरज असल्याचंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. सांगूनही लोकसंख्या कमी होत नसेल तर सक्ती करण्याची गरज आहे. यासाठी जनतेला प्रोत्साहन द्यावं लागेल. कमी अपत्य असणाऱ्यांपर्यंत फायदे पोहोचवावे लागतील. याकडे आपण हिंदू, मुस्लिम असं पाहू नये असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलं.  


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा