महाराष्ट्रातील २९ हजार गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर तोफ डागली आहे. २९ हजार गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला तर, दुष्काळासाठी राज्य सरकारनं काय केलं ते सांगावं. दुष्काळाची कामं केली तर मग दुष्काळ जाहीर का करावा लागला, असे प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत उपस्थित केले आहेत. तसंच, दुष्काळाचा भीषण प्रश्न का निर्माण झाला? तुम्ही कोणत्या उपाययोजना केल्या. त्याशिवाय, दुष्काळ निवारणासाठी जर सरकारकडं निधी आहे, तर मग तो खर्च का करत नाही असा सवालही देखील राज ठकरेंनी विचारला आहे.
ठाण्यात मनसे पदाधिकाऱ्यांचं सोमवारी महाराष्ट्रातील दुष्काळाबाबत माहिती घेण्यासाठी शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबीरादरम्यान राज ठाकरेंनी सरकार दुष्काळासंदर्भात गंभीर नाही. हे नेते दुष्काळ दौरे करुन काय करतात. महानगरपालिका आणि राज्य सरकारचा फक्त पैसा खर्च करतात. मी दुष्काळी दौरा करणार नाही. दुष्काळी टुरिझम करण्यात पॉईंट नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.
वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात आंदोलन छेडलं आहे. याबाबत राज ठाकरे यांनी राज्यातल्या मुला-मुलींना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिलं, तर महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच लागणार नाही, असं मत व्यक्त केलं आहे. राज्यातल्या तरूणांची राज्य सरकारनं फसवणूक केल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केला आहे.
आरक्षणाचा प्रश्न कोर्टात आहे, त्यावरून राज्य सरकारनं फसवणूक केली आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं. आरक्षणाचा निर्णय झाला तेव्हा पेढे वाटणारे भाजपाचे नेते कुठं आहेत, असाही सवाल राज ठाकरेंनी विचारला. मराठा तरूण-तरूणांना राज्य सरकारनं फसवलं आहे. राज्यातल्या स्थानिक तरूणांना नोकरीची संधी मिळाली, तर आरक्षणाची गरजच लागणार नाही असं देखील यावेळी राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
या पत्रकार परिषदेत दुष्काळ आणि आरक्षणाच्या मुद्द्यांशिवाय मोदींनी एअर स्ट्राईकबाबत केलेल्या वक्तव्याबाबतही राज ठाकरेंनी भाष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एअर स्ट्राईकबाबत जे वक्तव्य केलं त्यावरून देशाची खिल्ली उडवली जाते असं राज ठाकरेंनी म्हटलं. हल्ल्याआधीच्या ढगाळ वातावरण आणि पावसामुळं हल्ल्याची तारीख बदलण्याच्या विचारात तज्ज्ञ होते, त्यावेळी भारतीय विमानांना रडारपासून वाचण्यासाठी अशा वातावरणाचा फायदा होऊ शकतो असा सल्ला मी दिला होता असं मोदींनी म्हटलं होतं. या वक्तव्यावरून जगभरात आपली खिल्ली उडवली जाते आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलं.
एवढंच नाही जे चुकीचं सुरू आहे त्याबाबत बोललं गेलंच पाहिजे. मोदी सरकारविरोधात मी बोलतो आहे कारण त्यांनी कामं केली नाहीत. स्वप्न दाखवून त्यांनी भ्रमनिरास केला. जर कामं केली नाहीत तर कोणतंही सरकार असो त्याविरोधात बोललंच पाहिजे असं राज ठाकरेंनी म्हटलं. काँग्रेसच्या सरकारनं कामं केली नसती तरीही मी हेच बोललो असतो. माझं सरकार आलं उद्या आणि मी चुका केल्या, फसवणूक केली तर माझ्याविरोधातही बोललं गेलंच पाहिजे असं देखील राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
हेही वाचा -
नव्या महापालिका आयुक्तांनी पदभार स्वीकारला
वैद्यकीय प्रवेशाचा तिढा कायम, विद्यार्थ्यांचं आझाद मैदानावर आंदोलन सुरूच