Advertisement

मला हे वाचून धक्काच बसला, राज ठाकरेंचं पंतप्रधानांना पुन्हा पत्र

रेमडेसिवीर कसं घ्यायचं, कुठे, कसं वितरित करायचं याची संपूर्ण जबाबदारी आपण राज्यांकडे सोपवावी. ते काम खरंतर केंद्राचं नाही, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे.

मला हे वाचून धक्काच बसला, राज ठाकरेंचं पंतप्रधानांना पुन्हा पत्र
SHARES

महाराष्ट्रात रेमडेसिवीर औषधांचा तुटवडा जाणवत असल्याने अटीतटीच्या प्रसंगात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणं कठीण होऊन बसलं आहे. अशा स्थितीत रेमडेसिवीर कसं घ्यायचं, कुठे, कसं वितरित करायचं याची संपूर्ण जबाबदारी आपण राज्यांकडे सोपवावी. ते काम खरंतर केंद्राचं नाही, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे.

राज ठाकरे यांनी पंतप्रधानांना या पत्राद्वारे महाराष्ट्रातील कोरोना संकटांची जाणीव करून देतानाच रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यावर उपाययोजना देखील सुचवल्या आहेत. आपल्या पत्रात राज ठाकरे (raj thackeray) म्हणतात, भारताच्या इतिहासात इतकं मोठं आरोग्य संकट गेल्या १०० वर्षांत आलं नसावं, हे आव्हान म्हणूनच फार मोठं आहे. अशातच बातमी वाचली की रेमडेसिवीर सारख्या कोरोनावरील उपचारासाठी अत्यंत आवश्यक अशा इंजेक्शनची खरेदी आणि वितरण केंद्र सरकार स्वत: करणार आहे. मला हे वाचून धक्काच बसला. आपण नुकतं देशाला उद्देशून केलेलं भाषण मी काळजीपूर्वक ऐकलं. त्यात आपण राज्य सरकारांना काही सूचना केल्या आहेत आणि या भयानक संकटाचा सामना करण्यासाठी त्यांनी काय काय पावलं उचलली पाहिजेत याचं मार्गदर्शनही केलं आहे.

त्यानंतर मग रेमडेसिवीर सारख्या औषधांची खरेदी आणि वितरण केंद्राने स्वत: कडे ठेवण्याचं नियोजन काय? वास्तविक दिसतंय असं की त्या त्या राज्यांमध्ये राज्य सरकारचा आरोग्य विभाग तेथील महानगरपालिका, स्थानिक यंत्रणा, विविध पातळ्यांवरील कर्मचारी असेच लोकं अग्रभागी आहेत. तेच लोकांचे प्राण वाचवणं आणि त्यांना योग्य उपचार देणं यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. असं असताना केंद्रानं रेमडेसिवीरचं व्यवस्थापन स्वत:कडे ठेवण्याचं प्रयोजन काय?

हेही वाचा- “अपुनने एकही मारा.. लेकीन सॅालिड मारा..”, केदार शिंदेंनी केलं राज ठाकरेंचं कौतुक

कोरोनाविरूद्धच्या (coronavirus) या लढाईत केंद्राची भूमिका ही सहाय्यकाची, समन्वयाची आणि मार्गदर्शकाची आहे. यात प्रत्यक्षात अग्रणी आहे राज्य सरकारांची यंत्रणा. अशा परिस्थितीत केंद्रानं रेमडेसिवीरच्या वितरणाची यंत्रणा स्वत:कडे ठेवू नये. यातून प्रत्यक्ष काम करतात अशा यंत्रणांवरचा अविश्वास तर दिसतोच शिवाय त्यांच्याकडं असलेल्या स्थानिक परिस्थितीच्या आकलनाला आपण कमी लेखतो आहोत, असं दिसतं.

याबाबत माझी आपल्याला नम्र विनंती आहे की, रेमडेसिवीर कसं घ्यायचं, कुठे, कसं वितरित करायचं याची संपूर्ण जबाबदारी आपण राज्यांकडे सोपवावी. ते काम खरंतर केंद्राचं नाही.

कोरोनाविरूद्धची ही लढाई मोठी आहे. तिथं आपल्याला सर्वांना एकत्र येऊन सन्मवयानं, सहकार्यानं काम करण्याची गरज आहे. राज्य सरकारांच्या स्थानिक परिस्थितीबाबतच्या आकलनाचा आणि त्यांच्या प्रशासकीय यंत्रणांचा इथं आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने उपयोग करून घ्यायला हवा. आपल्या संविधानानं दिलेल्या संघराज्य पद्धतीचा आत्माही तोच आहे. 

मला आशा आहे की आपण माझ्या या विनंतीचा सकारात्मक विचार कराल आणि राज्य सरकारांना या बाबतीतील स्वातंत्र्य द्याल, अशी विनंती राज ठाकरे यांनी पंतप्रधानांना केली आहे. 

(mns chief raj thackeray wrote a letter to pm narendra modi over remdesivir injection distribution )

हेही वाचा- कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर त्यांना; राज ठाकरेंकडून प्रतिक्रिया

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा