Advertisement

बोरिवलीत स्थानिक आमदाराचा मराठी व्यावसायिकांना त्रास; मनसेचा आरोप

मनसेच्या पुढाकारानंतर साटम कुटुंबाचा नाश्त्याचा स्टॉल पुन्हा सुरू करण्यात आला.

बोरिवलीत स्थानिक आमदाराचा मराठी व्यावसायिकांना त्रास; मनसेचा आरोप
SHARES

कोरोनामुळं लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळं अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला. रोजगार गेल्यानं प्रत्येकाला आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागलं. त्यामुळं कुटुंबावर ओढावलेल्या या आर्थिक संकटातून (financial issue) बाहेर पडण्यासाठी अनेकांनी विशेषत: मराठी माणसांनी घरगुती सामान, वाण सामान, भाजीपाला, नाश्त्याचे पदार्थ इत्यादी यांसारखे छोटे-मोठे धंदे सुरू केले. परंतू, मराठी माणसाला प्रोत्साहन देण्याऐवजी काही राजकीय व स्थानिक प्रशासनाकडून उगाचच त्रास देण्याचे प्रकार घडत आहेत.  याप्रकरणी मनसेनं बोरिवलीतील स्थानिक आमदार सुनिल राणे (sunil raneMLA Borivali Vidhan Sabha) यांच्यावर आरोप केले आहेत.

बोरिवलीतील नाटकवाला लेन परिसरात तहसीलदार कार्यालयाबाहेर आर्थिक अडचणीत सापडलेल्या एका मराठी महिलेने नाश्त्याच्या (breakfast stall) पदार्थांचा स्टॉल लावला आहे. परंतू, आमदार सुनिल राणे यांच्या सांगण्यावरून महापालिका अधिकारी त्रास देत असून, त्यांनी नाश्त्याचा स्टॉल जबरदस्तीनं उचलून नेल्याचा आरोप या महिलेनं केला आहे. पैसे भरायची तयारी असूनही महापालिकेचे अधिकारी हा स्टॉल देण्यास तयार नाही. शिवाय, याच लेन परिसरात इतर परप्रांतिय धंदा करत असूनही त्यांच्यावर कारवाई का नाही?, असा प्रश्न या महिलेनं उपस्थित केला.  

हा प्रकार मनसेचे सरचिटणीस नयन कदम (Nayan Kadam  MNS general secretary) यांना कळाल्यावर त्यांनी याबाबत महापालिका अधिकाऱ्यांना विचारणा केली. तेव्हा त्यांना दंड भरवा लागेल असं अधिकाऱ्यानं त्यांना सांगितलं. त्यावेळी कदम यांनी सदर महिला दंड भरण्यास तयार असून, तुम्ही इतर फेरीवाल्यांकडूनही दंड घेणार का? असा सवाल उपस्थित केला. तसंच, तुम्ही केवळ मराठी माणसाला त्रास देण्याचा ठेका घेतला आहे का? असा आरोपही केला.

यावेळी ३ मुलं शिक्षण घेत असून, त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी नाश्त्याचा स्टॉल लावल्याचं सदर महिलेनं सांगितलं. दरम्यान, मनसेच्या पुढाकारानंतर या महिलेचा नाश्त्याचा स्टॉल पुन्हा सुरू करण्यात आला आहे. त्यानंतर, 'नाटकवाला लेन परिसरात तहसीलदार कार्यालय असून तिथे मोठी वर्दळ असते, म्हणून इथं या महिलेनं हा स्टॉल लावला आहे. इतर परप्रांतियांवर कारवाई न करता तसंच, रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत फेरिवाल्याकडं दुर्लक्ष करून केवळ मराठी माणसांना त्रास देण्याचा प्रयत्न झाल्यास मनसे हा प्रकार जराही सहन करणार नाही. शिवाय, सत्ता कोणाचीही असो मनसे मराठी माणसाच्या मागे नेहमीच उभी राहील', असं नयन कदम यांनी सांगितलं.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा