मी राज्याच्या गृहमंत्रीपदाचा कारभार सांभाळत असताना अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. अनेक प्रकरणांत चौकशीचे आदेश दिले. कदाचित त्यामुळे केंद्र सरकार माझ्यावर नाराज असावं. म्हणूनच माझ्यावर सीबीआय आणि आता ईडीची चौकशी लावण्यात येत असल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना केला.
सोशल मीडियावर टाकलेल्या आपल्या व्हिडिओत अनिल देशमुख (anil deshmukh) म्हणतात, ईडी (अंमलबजावणी संचलनालय) च्या माध्यमातून माझी चौकशी होणार असल्याची मला माहिती मिळत आहे. मधल्या काळात केंद्रीय तपाय यंत्रणे (सीबीआय)च्या माध्यमातून चौकशी झाली. आता ईडीच्या माध्यमातून होणार. मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देण्याचं काम राजकीय हेतूपोटी याठिकाणी चालू आहे.
मी गृहमंत्री असताना अन्वय नाईक प्रकरणी कारवाई केली. त्याचबरोबर सीबीआयला महाराष्ट्रात कुठणाची तपास करण्याची गेल्या अनेक वर्षांपासून मुभा होती, त्यावर आॅक्टोबर महिन्यात आम्ही निर्णय घेऊन शासनाच्या परवानगीशिवाय सीबीआय महाराष्ट्रात कोणतीही चौकशी करू शकणार नाही, अशा पद्धतीचा निर्णय घेतला. त्याचबरोबर दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी जी आत्महत्या केली, हा प्रश्न जेव्हा विधानसभेत उपस्थित झाला, तेव्हा आमदारांच्या मागणीनुसार या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी नेमली. या सर्व प्रकरणांमुळे केंद्र शासन बहुतेक नाराज असू शकतं. त्यामुळेच माझी सीबीआय, ईडीच्या माध्यमातून चौकशी होत आहे, असा अंदाज अनिल देशमुख यांनी व्यक्त केला.
हेही वाचा- अनिल देशमुखांवर आता ईडीकडूनही गुन्हा दाखल
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं। pic.twitter.com/0GoSjtEpkr
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) May 11, 2021
दरम्यान, ईडीने अनिल देशमुख यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना दर महिन्याला १०० कोटी रुपयांचे टार्गेट दिल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. अनेक अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या बदल्या ते भ्रष्ट मार्गाने करत होते, असे आरोप अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आले आहेत. त्यामुळे सीबीआयने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने नोंद केलेल्या गुन्ह्याच्या आधारेच ईडीने गुन्हा दाखल केल्याचं सांगितलं जात आहे. त्यानुसार ईडीकडून त्यांची चौकशी देखील होणार आहे.
(modi government upset of me says ncp mla anil deshmukh)