माझं आत्मचरित्र लिहून तयार झालं असून लवकरच या आत्मचरित्राचं प्रकाश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येईल. या आत्मचरित्रातूनच माझं शिवसेना सोडण्यामागचं खरं कारण सगळ्यांपुढं येईल, असं वक्तव्य खासदार नारायण राणे यांनी एका वृत्तवाहिनीला शनिवारी दिलेल्या मुलाखतीत केलं. या आत्मचरित्रातून अनेक गुपितंही बाहेर येतील, असंही राणे म्हणाले.
काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश यांनी ट्विट करत अब आयेगा मजा, सबका हिसाब होगा म्हणत नारायण राणे आत्मचरित्र लिहित असल्याबद्दलची माहिती दिली होती.
त्यावर विचारलं असता राणे म्हणाले की, माझ्या आत्मचरित्रात शिवसेना, काँग्रेस आणि भाजपा पक्षातील प्रवासाबद्दल लिहिलं आहे. मी शिवसेना का सोडली, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी लोकांना कसा त्रास दिला हे देखील मी माझ्या आत्मचरित्रात लिहिलं आहे. उद्धव ठाकरेंसोबत माझे वैयक्तिक मतभेद नसून केवळ वैचारीक मतभेद आहेत, असंही त्यांनी नमूद केलं.
काँग्रेसमधून बाहेर पडण्याचं कारण काय? भाजपाला जवळ का केलं? यामागची सगळी कारणं माझ्या आत्मचरित्रातून समोर येतील असंही त्यांनी स्पष्ट केलं.
१९७२ मध्ये शिवसेनेत प्रवेश करणारे राणे यांनी २००५ मध्ये शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तर २०१७ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडत त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करत भाजपाला पाठिंबा दिला.
हेही वाचा-
राहुल शेवाळेंच्या पत्नी कामिनी यांना १ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा
सट्टा बाजाराची मुंबईत युतीला पसंती, ५ जागा मिळण्याचा दावा