Advertisement

सट्टा बाजाराची मुंबईत युतीला पसंती, ५ जागा मिळण्याचा दावा

जिंकणाऱ्या पक्षावर एका हजार रुपयामागे ५०० रुपये नफा मिळतो. तर हरणाऱ्या पक्षावर १००० रुपये लावल्यास २००० नफा मिळणार. ज्या उमेदवारावर कमी पैसे लावले जातात त्याचा विजय निश्चित मानला जातो.

सट्टा बाजाराची मुंबईत युतीला पसंती, ५ जागा मिळण्याचा दावा
SHARES

लोकसभा निवडणुकीत चौथ्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर मुंबईच्या सहा जागांवर सट्टा बाजारात भाजपच फेव्हरेट असल्याचे दिसून येत असले, तरी सहापैकी एका जागेवर काँग्रेस उमेदवाराकडून काँटे की टक्कर दिली जाऊ शकते. असा अंदाज सट्टेबाजारात वर्तवण्यात येत आहे. मुंबईत महायुतीला ६ पैकी ५ जागांवर यश मिळणार असल्याची चर्चा सट्टाबाजारात आहे. तर दक्षिण मुंबईत चुरशीची लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात सर्वाधिक सट्टा २०१९ च्या निवडणुकांवर लागल्याची माहिती सट्टा खेळणाऱ्यांनी दिली आहे. 


भाजपला पसंती

लोकसभा निवडणुकीत सट्टा बाजार तेजीत असून, भाजपसह विविध पक्षांवर कोट्यवधींची रक्कम लावण्यात आली आहे. सद्यस्थितीत सट्टा बाजारात भाजपला पसंती मिळत असली, तरी मतदानाच्या टप्प्यांगणिक त्यांच्या जागा या फारच कमी मतांनी निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चौथ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर युतीला मुंबईत ६ पैकी ५ जागांवर विजय मिळेल, तर दक्षिण मुंबईतील शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत आणि मिलिंद देवरा यांच्यात तगडी लढत होणार असून दोघांपैकी कुणीही काही हजार मतांच्याच फरकाने निवडून येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


कमी पैसे, विजय निश्चित

जिंकणाऱ्या पक्षावर एका हजार रुपयामागे ५०० रुपये नफा मिळतो. तर हरणाऱ्या पक्षावर १००० रुपये लावल्यास २००० नफा मिळणार. ज्या उमेदवारावर कमी पैसे लावले जातात त्याचा विजय निश्चित मानला जातो. त्यानुसार उत्तर मुंबईतील उमेदवार गोपाळ शेट्टीवर सट्टेबाजारात  २७ पैशांचा सट्टा लावण्यात आला आहे. तर त्यांच्या विरोधात असलेल्या काँग्रेसच्या उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकरवर ३ रुपये भाव लावण्यात आला आहे. त्याचप्रमाणे गजानन किर्तीकर ६५ पैसे, संजय निरुपम १ रुपया १० पैसे, राहुल शेवाळे ४५ पैसे, एकनाथ गायकवाड १ रुपये ६० पैसे, संजय दिना पाटील १ रुपये १७ पैसे, मनोज कोटक ७० पैसे, पूनम महाजन ५५ पैसे, प्रिया दत्त १ रुपया, अरविंद सावंत ५४ पैसे, मिलिंद देवरा ५२ पैसे असे भाव लावण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. 


सट्टेबाजांना अचूक अंदाज

असे म्हणतात, की राजकीय वातावरणाचा सर्वात अचूक अंदाज सट्टेबाजांना लागतो. मतदार ज्या पक्षाच्या बाजूने बोलतात तसे सट्टा लावणारे देखील भाव बदलतात. दीड वर्षांपूर्वी गुजरातमध्ये भाजपची सत्ता येईल, हा सट्टा बाजाराचा अंदाज खरा ठरला होता. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या पाच राज्यांतील निवडणुकांतही याचा प्रत्यय आला होता. राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार येईल, हे त्यावेळी सट्टेबाजांनी सांगितले होते. मात्र छत्तीसगडमध्ये भाजप फार कमी अंतराने विजयी होईल, हा सट्टेबाजांचा अंदाज चुकीचा ठरला होता. तूर्तास तरी सट्टेबाजांचे मत आपल्या बाजूने असल्यामुळे भाजपला खुश व्हायला हरकत नाही.



हेही वाचा -

राहुल शेवाळेंच्या पत्नी कामिनी यांना १ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा