विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली असून अधिवेशनाची सुरुवातच गोंधळाने आणि आंदोलनानं सुरू झाली होती. तोच गोंधळ आणि गदरोळ दुसऱ्या दिवशीही पाहायला मिळाला. दुसऱ्या दिवशीही विरोधक आरक्षण आणि दुष्काळाच्या मुद्द्यावर आक्रमक झाले.
विरोधकांना विधानसभेत प्रचंड गदारोळ घातला, घोषणाबाजी केली. इतकंच काय तर राजदंडही पळवला. मराठा समाजाच्या आरक्षणाचा अहवाल विधानसभेत सादर करण्याच्या मागणीवरून विरोधकांचा गोंधळ कायम होता.
मराठा आरक्षण आणि दुष्काळ या विषयावर सरकारला धारेवर धरण्याचे संकेत याआधीच विरोधकांनी दिले होते. त्यानुसार पहिल्या दिवशी आरक्षणाच्या-दुष्काळाच्या मुद्द्यावर आक्रमक असलेल्या विरोधकांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही हे दोन मुद्दे उचलून धरले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत अजित पवार यांनी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच मराठा, मुस्लिम आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचं काय झालं? असा प्रश्न उपस्थित केला. तर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल विधानसभेत सादर करण्याची मागणी केली.
आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातल्यानं विधानसभेचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आलं. आक्रमक विरोधकांनी राजदंड पळवला. तर कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतरही गोंधळ कायम होता. आरक्षण मिळू नये असं विरोधकांना वाटत अाहे. पण त्यांचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही, असं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं. त्यावेळी विरोधकांचा गोंधळ आणि घोषणाबाजी सुरूच होता.
मराठ्यांबरोबरच मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून गोंधळ घालत मुस्लिम आमदारांनी दोन राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. तर विधानसभा अध्यक्षाच्या दिशेने कागदपत्र भिरकावण्याचा प्रकारही आमदारांकडून घडला. हा गोंधळ लक्षात घेता शेवटी विधानसभेचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकुब करण्यात आलं. त्यानंतरही विरोधक अहवाल सादर करण्याच्या मागणीवर ठामच दिसले.