केरळमध्ये महापुराचा तडाखा बसलेल्या शहरांमधील पुरग्रस्तांसाठी विविध स्तरातून मदतीचा हात पुढे केला जात आहे. असं असतानाच आता मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले आहेत.
केरळमध्ये आलेल्या महापुराने आतापर्यंत 300 हून अधिक लोकांचे बळी घेतले असून अनेकांचे संसार या पाण्यात वाहून गेलं आहे. त्यामुळे या पुरग्रस्तांना राज्य सरकार तसेच विविध स्वयंसेवी संस्थांच्यावतीनं मदत केली जात असतानाच मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक एक महिन्याचं मासिक मानधन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे मंगळवारी सुपूर्त करणार असल्याची माहिती महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी दिली.
मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ नगरसेवक असून या नगरसेवकांना मासिक २५ हजार एवढं मानधन आहे. त्यामुळे ९ नगरसेवकांचं २ लाख २५ हजार रुपयांची रक्कम पुरग्रस्तांसाठी दिली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यापूर्वी भाजपाच्या नगरसेविका प्रिती सातम यांनी आपलं एक महिन्याचं मानधन केरळच्या पुरग्रस्तांसाठी जाहीर करत याबाबतचं पत्र महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि महापालिका चिटणीस यांना दिलं होतं.
हेही वाचा -
शिवसेना आमदार-खासदारांकडून केरळ पूरग्रस्तांना एका महिन्याचं वेतन