महाराष्ट्राच्या सत्ताकेंद्रात मराठी भाषेला किती वाईट दिवस आले आहेत, याची प्रचिती यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सातत्याने येत आहे. राजभाषा दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचं अभिभाषण गुजरातीतून ऐकू आल्याची घटना ताजी असताना मंगळवारी मराठीच्या गळचेपीचा आणखी एक प्रकार घडला. विधानभवनाच्या प्रांगणात मराठी अभिमान गीताचं समूहगायन होत असताना त्यातील एक कडवंच गाळल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यामुळे मराठी भाषा दिनीच सरकारने मराठीचा अपमान केल्याची जोरदार टीका विरोधकांनी केली आहे.
मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने मराठीचा सन्मान करण्यासाठी सरकारने विधान भवनाच्या प्रांगणात मराठी अभिमान गीताचे समूहगायन आयोजित केलं होतं. यासाठी दोन्ही सभागृहातील सदस्य, अध्यक्ष गायक संगीतकार कौशल इनामदार, विधानसभा अध्यक्ष, सभापती आणि सत्ताधारी सदस्य यांना आमंत्रित करण्यात आलं. समूहगायनासाठी सगळ्यांच्या हातात अभिमानगीताच्या प्रतीही देण्यात आल्या. मात्र समूहगायन सुरू झाल्यावर समोरचे एक आणि आपण एक गात आहोत, अशी प्रचिती आल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
मात्र त्यांनी गिरीश महाजन यांना यासंदर्भात विचारले असता 'दादा समजून घ्या', असं उत्तर त्यांना मिळाल्याचं स्पष्ट केलं. मात्र मराठी राजभाषा दिनी अभिमान गीतातील सातवं कडवंच गाळले असल्याचा आरोप अजित पवारांनी केला आहे. हा केवळ मराठी अस्मितेचा नाही तर कविवर्य सुरेश भटांचाही अपमान असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच सोमवारी झालेल्या प्रकरणानंतरही मराठीच्या अस्मितेवर असा घाला करणे म्हणजे अक्षम्य असल्याचं त्यांनी म्हटलं.
हे सरकार इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये एवढं उत्तम असताना अशा चुका मराठी भाषेच्या बाबतीत का घडत आहेत? हा प्रश्न उपस्थित होत आहे. आता ही चुक दुरुस्त करण्यासाठी पुन्हा सभागृह स्थगित करून हा कार्यक्रम घ्यायचा का हे स्पष्ट करावं. अन्यथा यासाठी जबाबदार यंत्रणेवर कारवाई करावी.
- राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते, विधानसभा