Advertisement

पेंग्वीनचा १५ कोटींचा ठेका कुणासाठी? राणेंचं महापौरांना पत्र

वाघांची देखभाल मनपा कर्मचारी करू शकतात, मग पेंग्वीनच्या १५ कोटींचा ठेका कुणासाठी? असा प्रश्न नितेश राणेनी उपस्थित केला.

पेंग्वीनचा १५ कोटींचा ठेका कुणासाठी? राणेंचं महापौरांना पत्र
SHARES

भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना पत्र लिहिलं आहे. वाघांची देखभाल मनपा कर्मचारी करू शकतात, मग पेंग्वीनच्या १५ कोटींचा ठेका कुणासाठी?, असा सवाल त्यांनी महापौरांना पत्राच्या माध्यमातून विचारला आहे.

पत्रात नितेश राणे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, “आपण मुंबईच्या प्रथम नागरिक आहात. ही सन्मानाची बाब असली पाहिजे. पण आपण घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ज्या पद्धतीनं आपण मुंबईकरांची दिशाभूल केलीये, हे अत्यंत निंदनीय आहे”

“असो, आम्हीही समजू शकतो की ‘पेंग्वीन’च्या दबावामुळे आपण खोट्याला खरं सिद्ध करण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला. महापालिकेनं प्रकाशीत केलेल्या आकडेवारीप्रमाणे पर्यटकांची संख्या २०१७ ते २०१८ या आर्थिक वर्षात १७ लाख ५७ हजार ०५९ होती. पण मागील दोन वर्षांमध्ये पर्यटकांचा आकडा कमी झाला, आता ती संख्या १० लाख ६६ हजार ०३६ वर आलीय. त्यामुळे तीन वर्षांत सात लाख पर्यटकांची संख्या घटलेली आहे.” असंही त्यांनी पत्रात सांगितलं.

“मुळात महसूल वाढला म्हणून आकर्षण वाढले असा भ्रमीत करण्याचा प्रयत्न आपण केला. पण वास्तवामध्ये २०१० पर्यंत या राणीबागेतील प्रवेश शुल्क हे ५ रुपये होते. पण त्यानंतर हे शुल्क आपण ५ रूपयांवरून थेट ५० रूपयांवर नेलं. दोन प्रौढ आणि बारा वर्षाखाली दोन मुले आदींसाठी १०० रुपये आणि एका प्रौढ व्यक्तीला ५० रुपये अशाप्रकारचे अजब शुल्क आकारण्यात येत आहे. त्यामुळे जो महसूल वाढलेला आहे, तो या वाढीव शुल्कामुळे आहे पर्यटकांची संख्या किंवा आकर्षण वाढल्यानी नाही.”

“एवढंच नाही तर शक्ती आणि करिष्मा ही वाघाची जोडीही आकर्षण असल्याचं आपण सांगितलंत पण जर वाघाची देखभाल महापालिका कर्मचारी स्वतः करू शकतात तर पेंग्वीनची का नाही? हा पंधरा कोटीचा पेंग्वीन देखभालीचा ठेका कोणासाठी?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

“राणीचा बाग हा सामान्य मुंबईकर कुटुंबातील लहान मुलांसाठी आईवडीलांकडे हट्ट करून जाण्याचं ठिकाण होतं. पण एका ‘पेंग्वीन’च्या बालहट्टामुळे त्यांचे हक्काचे खेळण्याचे-विरंगुळ्याचे स्थानही आपण अव्वाच्या सव्वा तिकीट दर लावून हिरावून घेतलं.”

“इतकेच नाही तर लहान मुलांना पाहता यावं म्हणून हा पेंग्विन कक्ष बनवला पण मुंबईतील लॉकडाऊन टप्प्याटप्प्यानं शिथिल करताना राणीबागचे दरवाजे मुलांसाठी खुले केले गेले नाहीत. मग कुठल्या बाळाचा छंद पुरवण्यासाठी ही कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होतेय? हे तरी सांगा” असे बरेच प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केले.


हेही वाचा

असल्या फडतूस नोटीस आणि धमक्यांना घाबरत नाही : किरीट सोमय्या

अनिल परब यांचा किरीट सोमय्यांवर १०० कोटींचा मानहानीचा दावा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा