मुंबई - मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मतदार यादीतील घोळामुळे मतदार राजाला प्रचंड त्रास झाला. याचे तीव्र पडसाद मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. मतदार यादीतील गायब झालेल्या 11 लाख मतदारांच्या घोळाची चौकशी करण्याची मागणी स्थायी समितीने केली आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये निवडणूक खर्चाचा प्रस्ताव मंजुरीला आला असता भाजपाचे दिलीप पटेल यांनी यावर बोलताना 11 लाख मतदारांच्या गायब झालेल्या नावांबाबत चिंता व्यक्त केली. 11 लाख मतदारांचा विचार केला तर प्रत्येक प्रभागांमध्ये चार ते साडेचार हजार मते कमी झाली आहेत. त्यामुळे ही मते वाढली असती तर मुंबईत भाजपाचे 130 उमेदवार निवडून आले असते, असा दावा पटेल यांनी केला. त्यामुळे निश्चित याची चौकशी केली जावी अशी मागणी त्यांनी केली. सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव यांनीही चौकशीची मागणी करत मतदारांना झालेल्या त्रासाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानुसार स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी याची चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.