सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि एनआरसीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीनं गुरूवारी दादर येथे धरणं आंदोलन केलं. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. 'आजोबा, बाप कुठं मेला हे ज्यांना माहीत नाही, त्यांच्याकडं कागदपत्रं मागता काय,' असा शब्दात आंबेडकर यांनी मोदी सरकारवर टीका केली.
नागरिकत्व कायदा हा केवळ मुस्लिम विरोधी नाही तर ४० टक्के हिंदूच्याही विरोधातील आहे, असा आरोपही यावेळी आंबेडकर यांनी केला. यावेळी आंबेडकर म्हणाले की, सीएए व एनआरसी हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपचा डाव आहे. आजही देशातील अनेकांचे संसार गाढवाच्या पाठीवर आहेत. त्यांच्याकडं कसलेही पुरावे नाहीत. बाप कुठं मेला? आजोबा कुठं मेला? हेही अनेकांना माहीत नाही. त्यांच्याकडून नागरिकत्वाचे पुरावे मागितले जाणार आहेत. हा अन्याय आहे.
आंबेडकर म्हणाले, “सरकारने आणलेली डिटेन्शन कँपची जी पद्धत आहे, ती ब्रिटिशांनी आणलेली पद्धत आहे. त्यावेळी त्यांनी जो गुन्हेगारी जमात कायदा केला यामध्ये ज्या जमातींना गुन्हेगार ठरवलं गेलं, त्या जमातींना डिटेन्शन कँपमध्ये ठेवण्यातं आलं होतं. हिंदू-मुस्लिमांनी एकत्र येऊन हा लढा लढायला हवा.विचारपूर्वक केलेल्या या कायद्याला संघर्षपूर्ण उत्तर द्यावं लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला डिटेन्शन कँपमध्ये जायचं नसेल तर या सरकारविरोधात आवाज उठवायला पाहिजे, असंही आवाहन यावेळी त्यांनी केलं.
हेही वाचा -
मंत्रीमंडळ विस्तारात घटक पक्षांनाही मंत्रीपदं ?
मोदींवर मिम्सचा पाऊस, मिम्स बनवणाऱ्यांना मोदी म्हणाले...