लोकसभा निवडणुका जवळ येताच सर्व मतदारसंघांमधील इच्छुकांची संख्याही वाढत चालली आहे. मुंबई काँग्रेसमध्ये तर एका जागेसाठी ३ जण इच्छुक असल्याचं समोर येत आहे. ही जागा म्हणजे उत्तर पश्चिम मतदारसंघ.
उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसच्या ३ नेत्यांमध्ये चढाओढ दिसत आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम, काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चर्तुवेदी आणि माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांनी या मतदारसंघावर दावा केला आहे. २०१४ चा अपवाद वगळल्यास हा मतदारसंघ काँग्रेसच्याच ताब्यात होता. २०१४ पूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत आणि त्यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील दत्त यांचं इथं वर्चस्व होतं. परंतु २०१४ मध्ये शिवसेनेच्या गजानन किर्तीकर यांनी कामत यांचा पराभव केला. उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिम अशा विधानसभा मतदारसंघाचा यांत समावेश आहे.
लोकसभेत धूळ चारल्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ६ जागांवर शिवसेना आणि भाजपाचे उमेदवार निवडून आले. त्यामुळे पुन्हा हा मतदारसंघ आपल्या ताब्यात आणण्यासाठी काँग्रेसला संघर्ष करावा लागणार आहे. गुरुदास कामत यांच्या निधनानंतर संजय निरूपम यांनी मतदारसंघाची बांधणी केली आहे.
अन्य इच्छुकांच्या तुलनेत संजय निरूपम यांचा जनसंपर्क दांडगा असल्याचं म्हटलं जात आहे. गेल्या निवडणुकीत मुंबईतील ६ लोकसभेच्या जागांपैकी एकाही जागेवर काँग्रेसला विजय मिळवता आला नव्हता. परंतु गेल्या निवडणुकांसारखी परिस्थिती या निवडणुकांदरम्यान नाही. त्यामुळे गेल्या निवडणुकांचा वचपा काढण्यास काँग्रेसही सज्ज झाली आहे. आता या मतदारसंघातून कोणाला तिकीट मिळणार हे लवकरच समोर येणार आहे.
हेही वाचा -
कालिदास कोळंबकर भाजपाच्या वाटेवर?
दक्षिण मध्य मुंबईतून पुन्हा राहुल शेवाळे यांना उमेदवारी ?