लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मात्र, मोदींच्या या शपथविधीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पाचव्या रांगेत स्थान देत त्यांचा अवमान केला गेल्याचं बोललं जात होतं. या सगळ्या प्रकरणावर शरद पवार यांनी अखेर स्पष्टीकरण दिलं आहे. 'रांगेवरून निर्माण झालेल्या वादात कोणा एकाची चूक झाली असावी. ती माझ्या कार्यालयाची असेल किंवा त्यांच्या कार्यालयाची. पण तो विषय इतका मोठा नाही. तो आता संपायला हवा,' असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.
नरेंद्र मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्यात पाचव्या रांगेतील पास देण्यात आला होता. त्यामुळं शरद पवार यांनी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले नव्हते. त्यावरून मोदी सरकारवर टीकाही करण्यात आली होती. मात्र, पवारांना अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या रांगेतच स्थान देण्यात आलं होतं. VVIP मधील V शब्दावरून त्यांच्या सचिवांचा गोंधळ झाला असावा, असा खुलासा राष्ट्रपती भवनातून नुकताच करण्यात आला. त्यामुळं पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली होती. याबाबत पवारांनी गुरुवारी पुण्यातील भोसरी इथं पसारमाध्यमांशी बोलताना त्यांची बाजू मांडली.
'माझ्या सचिवांनी बैठक व्यवस्थेबद्दल दोनवेळा चौकशी केली होती. मात्र, दोन्ही वेळी एकच उत्तर देण्यात आलं. कुणाकडून तरी त्रुटी राहिली असण्याची शक्यता आहे. मात्र हा विषय आता संपवायला हवा,' असं त्यांनी महटलं आहे.
हेही वाचा -
शिवसेनेने दोन-तीन पदांसाठी युती केलेली नाही- उद्धव ठाकरे
आरटीजीएस, एनईएफटी शुल्क रद्द; आरबीआयचा निर्णय