दोन दिवसांचा अयोध्या दौऱ्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी दुपारी मुंबईत परतले आहेत. फैजाबाद विमानतळावरून विशेष विमानाने मुंबई विमानतळावर दाखल होताच उद्धव ठाकरेंचं जंगी स्वागत करण्यात आलं.
यावेळी उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी शिवसैनिकांनी मुंबई विमानतळावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. उद्धव ठाकरे मुंबई विमानतळावर येताच शिवसैनिकांनी जोरात घोषणाबाजीला सुरुवात केली. अनेक शिवसैनिकांनी पुष्पगुच्छ देऊन उद्धव यांचं स्वागत केलं.
उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यामध्ये शरयू नदी काठी महाआरती केली. तसंच सहकुटुंबीयांसह रामलल्लाचं दर्शन घेतलं. दरम्यान अयोध्या दौऱ्यावर असताना उद्धव यांनी पत्रकार परिषदही घेतली. यावेळी त्यांनी 'जर राम मंदिर बनणार नसेल तर सरकारही बनणार नाही' असा इशारा भाजप सरकारला दिला आहे.