पीक विम्याच्या मुद्यावरुन आता शिवसेना आक्रमक झाली असून, शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेना बुधवारी विमा कंपन्याच्या कार्यालावर धडक मोर्चा काढला. वांद्रे कुर्ला संकुलातील (बीकेसी) भारती एक्सा या विमा कंपनीच्या कार्यालयावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात हा ‘इशारा मोर्चा’ काढण्यात आला. त्याशिवाय, स्वत: उद्धव ठाकरे या मोर्चाचं नेतृत्व केलं. तसंच, 'राज्यातील सर्व विमा कंपन्या आणि बँकांना मी हात जोडून विनंती करतो की, आम्हाला आक्रमक व्हायला लावून का. ज्या शेतकऱ्यांना पीकविमा देण्यात आला आहे तसेच ज्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे, त्यांच्या नावांची यादी या कंपन्यांनी आणि बँकांनी पंधरा दिवसांत आपल्या कार्यालयाच्या दरवाजावर लावावीत, अन्यथा हा मोर्चाच बोलेल' अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना इशारा दिला आहे.
वांद्रे कुर्ला संकुलातील (बीकेसी) एशियन हार्ट इन्स्टिट्यूटसमोरील एमएमआरडीएच्या पार्किंग लॉट येथून सकाळी ११ वाजता या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात उद्धव ठाकरेंसह युवासेना प्रमुख आदित्या ठाकरेही सहभागी झाले होते. तसंच, अनेक शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. त्यानंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळानं विमा कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये जाऊन कर्मचाऱ्यांची भेट घेतली.
"मी सर्व बँकांना, विमा कंपन्यांना १५ दिवसांची मुदत देतोय, १५ दिवसात सर्व कर्जमुक्ती झालेल्या शेतकर्यांना पैसे मिळालेचं पाहिजेत."
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) July 17, 2019
- शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे#DhadakMorcha pic.twitter.com/vJRhrRveQF
वेगवेगळे निकष लावून पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवत आहेत. त्यामुळं मोर्चाच्या माध्यमातून या कंपन्याना इशारा देण्यात येत आहे. 'शेतकऱ्यांसाठी काढलेल्या या मोर्चाला नौटंकी म्हणणारे नालायक आहेत', अशी टीका उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर केली. 'बीकेसीतील कार्यालये बघितली का नाही ? इथे काही दिवसांनी धडकावे लागणार आहे' असंही उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना म्हटलं.
"मी विमा कंपन्यांना विनंती करतो, आम्हाला आक्रमक व्हायला लावू नका."
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) July 17, 2019
- शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे#DhadakMorcha pic.twitter.com/VqEb5Co2U5
त्याशिवाय, 'सरकारनं कर्जमाफीचे पैसे बँकाना दिले तर पैसे गेले कुठे? पीक विमा कंपनी, बँकांचे अधिकारी आणि राज्य सरकारनं एकत्र येऊन बैठक घ्यावी. जी अडचण असेल त्यांनी बैठकीत मांडावी, मात्र शेतकऱ्यांची फसवणूक करु नये, हजारो कोटी रुपये पीक विमा कंपन्यांनी खाल्ले, पंतप्रधान पीक विमा योजना ही पीक विमा कंपन्यांसाठी आणली नाही तर शेतकऱ्यांसाठी आणली आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारला शेतकऱ्यांची जाणीव असेल तर पीक विमा कंपन्यांना का नाही? शेतकऱ्यांच्या योजनांमध्ये येणाऱ्या काळ्या मांजराविरोधात हा मोर्चा आहे' असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
हेही वाचा -
ओव्हरहेड वायर तुटल्यानं मध्य रेल्वे विस्कळीत
डोंगरीत ४ मजली इमारत कोसळून १३ जणांचा मृत्यू