एकीकडे २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा सेनेनं केली खरी, पण दुसरीकडे त्यांच्याच पक्षात अंतर्गत वादाला तोंड फुटलं आहे. आणि याकडे त्यांचं दुर्लक्ष होताना दिसत आहे.
घाटकोपरमध्ये शिवसेनेतला अंतर्गात वाद शिगेला पोहचला असून बाहेरून आलेल्या लोकांनाच पक्षात घ्यायचं असेल तर राज ठाकरेनांच का घेत नाही असा संतप्त सवाल शिवसैनिकांनी बॅनरबाजीतून केला आहे. मनसेतून शिवसेनेत आलेल्यांना पद दिल्यानं शिवसैनिकांनी उघडउघड आपली नाराजी व्यक्त केली आहे.
शिवसेनेतील नवीन नियुक्त्यांवरून घाटकोपरमध्ये शिवसैनिकच आपापसात भिडल्याची घटना घडली. शाखाप्रमुख पदावरून दोन गटातील शिवसैनिकांचा राडा झाला. घाटकोपर पश्चिममधील शाखा क्रमांक १२९ च्या बाहेर शिवसैनिकांचा राडा झाला. या शाखेच्या विभागात प्रदीप मांडवकर हे गेल्या सहा वर्षांपासून विभागाचे शाखाप्रमुख होते. मात्र नव्या नियुक्त्यांनंतर शिवाजी कदम यांची या पदावर निवड झाली.
शिवाजी कदम यांनी वर्षभरापूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला. शिवाय त्यांचे वयही जास्त आहे. त्यामुळे कदम यांना शाखाप्रमुख पद दिल्याने स्थानिक शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याच नाराजीतून मांडवकर आणि कदम यांचे समर्थक आपापसात भिडले.
घाटकोपरमध्ये नाराज शिवसैनिकांनी इशान्य मुंबईची “नवनिर्माण शिवसेना” अशी बॅनरबाजी केली आहे. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना घेण्याऐवजी राज ठाकरेंनाच पक्षात का घेत नाही?, असा सवाल शिवसैनिकांनी होर्डिंगच्या माध्यमातून केला आहे. शिवसेनेला निष्ठावंतांची गरज नाही, तर चार घरं फिरून आलेल्या लोकांची पक्षाला गरज असल्याचं म्हणत आपला संताप शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे.