Advertisement

शिवसेना-भाजपाचं उल्लू बनाविंग !


शिवसेना-भाजपाचं उल्लू बनाविंग !
SHARES

मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीत स्वतंत्र लढणाऱ्या शिवसेना आणि भाजपामधील युती अखेर बुधवारी महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत उघड झाली. निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांविरोधात आरोप, प्रत्यारोप तसेच टीका-टिप्पणी करत स्वत:चे नगरसेवक मोठ्या संख्येने निवडून आणले. परंतु त्यानंतरही आपण विरोधी पक्षात न बसता पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून भूमिका बजावणार असल्याचे सांगणाऱ्या भाजपाने महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत चक्क शिवसेनेला मतदान कली. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील युती उघड करत 'कल्याण-डोंबिवली पार्ट टू'चा भाग रंगवला.

मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपाची युती तुटली आणि ते स्वतंत्र लढले. पण सत्तेसाठी पुन्हा शिवसेनेने भाजपाशी सलगी केली. त्यानंतर कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत ही युती तुटली आणि त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढवली. त्यावेळी दोन्ही पक्षांनी एकमेकांची उणीधुणी काढत एकमेकांचे कपडेही उतरवले. पण अब्रुची लक्तरे काढूनही दोन्ही पक्ष पुन्हा सत्तेसाठी एकत्र आले. आता मुंबई महापालिका निवडणुकीत पुन्हा शिवसेना- भाजपाने युती तोडत यापुर्वीच्या दोन निवडणुकीचा कित्ता गिरवण्याचा प्रयत्न सुरु केला. 

प्रचार सभा आणि प्रचार फेरी यामधून पुन्हा एकदा दोन्ही पक्षांनी आपली पातळी दाखवून दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना भूलथापा मारत गुंडाळण्याचा प्रयत्न केला. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी 114 नगरसेवक निवडून येतील असा दावा केला. परंतु शिवसेनेचे 84 तर भाजपाचे 82 नगरसेवक निवडून आले. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाचे बहुमताएवढे नगरसेवक निवडून आले नाहीत. त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकत्र येतील, असा अंदाज बांधला जात होता. त्यात भाजपाने कोणतीही निवडणूक न लढवता आपण पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून काम पाहणार असल्याचे जाहीर केले. परंतु अशाप्रकारे जाहीर करून भाजपाने आपली छुपी युती असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. परंतु महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाने शिवसेनेच्या उमेदवाराच्या बाजूने मतदान करत दोन्ही पक्षांमध्ये युती असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका निवडणुकीनंतरही शिवसेना-भाजपामधील सूर जुळून आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना-भाजपाने मुंबईकरांना उल्लू बनवले असून आता पुढील पाच वर्षे हे दोन्ही पक्ष आपापसात भांडत आणि आरोप करत मुंबईकरांना उल्लू बनवणार आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा