शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पुन्हा एकदा वादंग निर्माण झालं आहे. याला कारणही तसंच आहे. दादर शिवाजीपार्क चौपाटीच्या सुशोभिकरणावर आता श्रेयवाद सुरू झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. 'शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सदा सरवणकर यांनी बुधवारी झालेल्या सुशोभीकरणाच्या कामाच्या भूमिपूजनाचा घाट घालून ‘आयत्या बिळावर नागोबा’ ही आपली वृत्ती तशीच असल्याचं दाखवून दिलं आहे, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी केली.
दादर शिवाजीपार्क येथील चौपाटीवर धूप प्रतिबंधात्मक बंधारा बांधण्यास २०१२ साली सुरूवात करण्यात आली होती. या कामाचं भूमिपूजन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. त्यानंतर २०१४ मध्ये या ठिकाणी सुशोभिकरणाचे काम हाती घेऊन ते पूर्ण करण्यात आलं. परंतु त्यानंतर महापौर बंगल्याच्या सुरक्षेचं कारण पुढे पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेनं पदपथाच्या वापरास विरोध करत त्या जागेला कुंपण घातलं होतं.
२०१४ साली लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यावेळी सदा सरवरणकर आणि राहुल शेवाळे निवडून आले होते. गेल्या साडेचार वर्षात कोणाचंही चौपाटीकडं लक्ष नव्हतं. परंतु अचानक आता पूर्ण झालेल्या कामाच्याच ठिकाणी पुन्हा भूमिपूजनाचा घाट घातला जात आहे, अशी टिका सरदेसाई यांनी केली. आमच्या कामाचं श्रेय कोणता अन्य पक्ष घेतोय याचं आम्हाला दु:ख नाही. परंतु गेली साडेचार वर्षांत मनसेला श्रेय मिळू नये म्हणून लोकांना केलेली बंदी ही दुर्देवी असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा -
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची पुनर्रचना
राहुल यांचं आश्वासन जुमलेबाजी नाही; संजय निरूपम यांचा दावा