मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती नलावडे यांनी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे आमदार पद अपात्र घोषित केले आहे. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, अर्ज दाखल करण्याची वेळ निघून गेल्यानंतर खोतकर यांनी स्थानिक उपविभागीय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे ते निवडणूक लढवण्यास पात्रच नव्हते, असे याचिकेत नमूद होते. या याचिकेवर शुक्रवारी (२४ नोव्हेंबर) सुनावणी झाली. २०१४ विधानसभा निवडणुकीमध्ये खोतकर केवळ २९६ मतांनी विजयी झाले होते.
दरम्यान, यावर एक महिन्याचा स्टे दिला असून आपण या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितले.