धर्मनिरपेक्ष सरकारच्या प्रमुखांनी धार्मिक सोहळ्याला जाणं टाळावं, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार माजित मेमन यांनी केलं आहे. त्यामुळे राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीतील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्र्म पार पडणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे नक्की जातील असं सांगितलं आहे. त्यावर प्रत्येकजण आपापली मतं नोंदवू लागलं आहे.
राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी निमंत्रण देण्यात आलेल्या निमंत्रीतांच्या यादीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे. कोरोनाच्या नियमांचं पालन करत उद्धव ठाकरे या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. पण धर्मनिरपेक्ष सरकारच्या प्रमुखांनी अशा धार्मिक कार्यक्रमांना प्रसिद्धी देण्यापासून दूर राहावं, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार माजिद मेमन यांनी आपल्या ट्विटर हँडलवर नोंदवलं आहे.
हेही वाचा - Ram Mandir: राम मंदिर भूमिपूजनाला जाणार उद्धव ठाकरे
Uddhav Thakrey is among invitees for bhoomi pujan of Ram Temple. He may participate respecting Covid 19 restrictions in his personal capacity. The head of a secular democracy should refrain from promoting a particular religious activity..
— Majeed Memon (@advmajeedmemon) July 21, 2020
यावरून वाद निर्माण झाल्यावर माझे ट्विट ही माझी वैयक्तिक मतं आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृत प्रवक्ता नाही, त्यामुळे ही मतं पक्षाचीच असतील, असं नाही. अयोध्येला जावं की नाही याबाबतचा निर्णय उद्धव ठाकरे काही मला विचारुन घेणार नाहीत किंवा मी तशा कुठल्या पदावरही नाही की त्यांनी याबाबत मला विचारावं, असा खुलासा माजिद मेमन यांनी केला.
तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी कोरोनावरून लक्ष वळवण्यासाठी राम मंदिराच्या भूमिपूजनाचा घाट घातला गेल्याची टीका केली. त्यावर प्रत्येकाला बोलण्याचा, मत मांडण्याचा अधिकार आहे. राज्यात तीन पक्षाचं सरकार आहे. त्यामुळे एखाद्या विषयावर एकमत झालंच पाहिजे असं महाविकास आघाडीच्या घटनेत लिहिलेलं नाही. त्यामुळे प्रत्येकजण आपआपल्या पक्षाची भूमिका घेऊन पुढे जातो. सरकार एकमताने चालवायचं, राज्याच्या हिताचा कार्यक्रम राबवायचा यावर आमचं एकमत आहे, असं सांगतानाच अयोध्येत जाणं न जाणं हा काही महाविकास आघाडी सरकार चालवण्याचा अजेंडा नाही, असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले.
येत्या ५ आॅगस्ट रोजी अयोध्येतील राम मंदिर उभारणीच्या कामाला भूमिपूजन सोहळ्यापासून सुरूवात होणार आहे. त्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून देखील हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.