मुंबई - पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी नाशिक ते मुंबई रॅली काढली. रविवारी ही रॅली मंत्रालय परिसरात पोहोचली. या सायकलस्वरांनी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेत 2 ऑक्टोबर हा "सायकल दिवस" जाहीर करावा अशी मागणी केली.
या सायकलस्वरांनी तीन दिवसांत नाशिक ते मुंबई असा सायकलने प्रवास केला. यात एकूण मुले आणि मुली मिळून 32 सायकलस्वार सहभागी झाले होते. "इंधन वाचावा, प्रदूषण टाळा", "सायकल चा वापर करा" असा संदेश त्यांनी रॅलीमधून दिला. "आम्ही गेल्या 15 वर्षांपासून सायकल चालवण्याचा संदेश देत आहोत. सायकल हे आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्य सुदृढ राखण्यासाठी चांगला व्यायाम आहे", सायकलिस्ट ज्ञानेश्वर गायकवाड यांनी सांगितले.