तृतीय राज्यस्तरीय सबज्युनीयर बॅडमिंटन निवड स्पर्धेत जयेश धुरी अॅकॅडमीच्या मानसी कारेकर आणि समृद्धी क्षत्रीय या मुंबईकर जोडीने १५ वर्षांखालील मुलींच्या दुहेरी गटात अजिंक्यपद पटकावलं. ही स्पर्धा रत्नागिरी बॅडमिंटन असोसिएशनतर्फे आयोजित केली होती. या स्पर्धेत राज्यभरातील एकूण ८९९ खेळाडूंचा सहभाग होता.
मुलींच्या दुहेरी फेरीत मानसी-समृद्धी या जोडीने पुण्याच्या पृथा डेकते आणि रिद्धी पुडके यांचा २२-२०, २१-९ अशा फरकाने धुव्वा उडवला. पहिला गेम अतिशय चुरशीचा होता. पण दुसऱ्या सामन्यात मानसी आणि समृद्धीने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी करत आघाडी मिळवली आणि २१-९ अशा फरकाने विजयावर शिक्कामोर्तब केलं.
याच गटात मुलांमध्ये ध्रुव ओझा, तनिष्क सक्सेना विजयी झाले. १३ वर्षाखालील एकेरी फेरीत आशिता सिंगने सोनाली मिर्खेकरचे आवाहन २१-११, २१-७ असे परतावून लावत विजय खिशात घातला. मुलांमध्ये प्रथम वाणीने सुवीर प्रधानला २१-२०, २१-१४ अशी धूळ चारली.
१५ वर्षाखालील एकेरी मुलींच्या गटात प्रेरणा अलवेकरने जानवी कानिटकरचा पराभव करत विजय मिळवला. १३ वर्षांखालील मुलांच्या दुहेरी गटात प्रज्वल सोनावणे आणि प्रथम वाणी तर मुलींच्या गटात हर्षदा गावडे आणि सोनाली मार्खेकरने जेतेपद पटकावले.
हेही वाचा -
वर्ल्ड बॅडमिंटन स्पर्धेत मुंबईच्या सुप्रियाला कांस्य पदक