Advertisement

तेंडुलकरांच्या ‘आमच्यावर कोण प्रेम करणार?’ नाटकात नीलकांती पाटेकर?

काळाच्या पुढील लिखाण करणारे लेखक अशी ख्याती असणाऱ्या तेंडुलकर यांच्या कथेवर आधारित असलेलं ‘आमच्यावर कोण प्रेम करणार?’ हे नाटक आता रंगभूमीवर अवतरणार आहे. या नाटकाद्वारे ज्येष्ठ अभिनेत्री नीलकांती पाटेकर रंगभूमीवर परतणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

तेंडुलकरांच्या ‘आमच्यावर कोण प्रेम करणार?’ नाटकात नीलकांती पाटेकर?
SHARES

विजय तेंडुलकर हे नाव केवळ मराठी रसिकांनाच नव्हे, तर भारतीय रंगभूमीच्या प्रेमात असलेल्या सर्वच चाहत्यांना ठाऊक आहे. काळाच्या पुढील लिखाण करणारे लेखक अशी ख्याती असणाऱ्या तेंडुलकर यांच्या कथेवर आधारित असलेलं ‘आमच्यावर कोण प्रेम करणार?’ हे नाटक आता रंगभूमीवर अवतरणार आहे. या नाटकाद्वारे ज्येष्ठ अभिनेत्री नीलकांती पाटेकर रंगभूमीवर परतणार असल्याचे संकेत मिळत आहेत.


प्रथमच रंगभूमीवर

तेंडुलकरांच्या सिद्धहस्त लेखणीतून अवतरलेल्या ‘आमच्यावर कोण प्रेम करणार?’ या कथेवर आधारलेलं नाटक प्रथमच रंगभूमीवर सादर होणार आहे. आपल्या लेखणीच्या माध्यमातून आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा अचूक वेध घेत त्या रंजक पद्धतीनं रसिकांसमोर मांडणं ही तेंडुलकरांची खासियत मानली जाते. थेट लक्षाचा वेध घेणारं लिखाण आणि सडेतोड भाषा यांमुळे त्यांचं साहित्य आजच्या पिढीवरही गारूड करत आहे. ‘आमच्यावर कोण प्रेम करणार?’ हे नाटक आजच्या काळात रंगभूमीवर येणं ही त्याचीच प्रचिती देणारं आहे.


विवाह आणि त्याबाबतची मानसिकता

या नाटकात तेंडुलकरांनी विवाह आणि त्याबाबतची मानसिकता अधोरेखित केली आहे. विवाहाबाबत मुलीला येणाऱ्या नकाराबाबतची समाजाची मानसिकता, रंगरूप, शिक्षण स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, मुलीला गृहित धरणं यांसारख्या मुद्द्यांवर या नाटकाद्वारे भाष्य करण्यात आलं आहे. विवाहासाठी मुलीला येणारा नकार आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीतून निर्माण होणाऱ्या विनोदांची अचूक सांगड घालत अनंत अंकुश हा तरुण दिग्दर्शक या नाटकाचं दिग्दर्शन करणार आहे. अनंतनं यापूर्वी ‘तिथे संदर्भ नसलेली गोष्ट’ या नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे.


महत्त्वपूर्ण व्यक्तीरेखेसाठी नीलकांती पाटेकर

या नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाची तारीख अद्याप ठरलेली नसली तरी विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मार्च किंवा एप्रिल महिन्यात ‘आमच्यावर कोण प्रेम करणार?’ हे तेंडुलकरांच्या कथेवरील प्रश्नार्थक शीर्षक असलेलं नाटक रंगभूमीवर येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या नाटकात तीन मुख्य व्यक्तिरेखा आहेत. यापैकी महत्त्वपूर्ण व्यक्तीरेखेसाठी नीलकांती पाटेकर यांना प्रथम पसंती दर्शवण्यात आली आहे. नीलकांती यांच्याकडे या नाटकाची संहितही वाचनासाठी पाठवण्यात आली आहे. वाचन झाल्यावर नीलकांती यावर आपला निर्णय कळवणार असल्याचं समजतं.


नाट्य रसिकांसाठी पर्वणी

नीलकांती यांनी जर होकार दिला, तर ‘आमच्यावर कोण प्रेम करणार?’ हे नाटक रसिकांसाठी एक पर्वणीच ठरेल यात शंका नाही. तेंडुलकरांचा स्पर्श लाभलेलं लेखन आणि त्यावर नीलकांती यांचा अभिनय नाटकाला एका वेगळ्याच उंचीवर नेईल. या नाटकात आणखी एक स्त्री आणि एक पुरुष व्यक्तिरेखा आहेत. यांपैकी स्त्री व्यक्तिरेखेसाठी दिप्ती देवीला अप्रोच करण्यात आला असून, पुरूष व्यक्तिरेखेसाठी सध्या कलाकाराचा शोध सुरू आहे.


शीर्षकही सेम

तेंडुलकरांनी त्या काळी लिहिलेली ‘आमच्यावर कोण प्रेम करणार?’ ही कथा कालातीत आहे. आजही आणि उद्याही ती पूरकच असेल. त्यामुळे केवळ त्या कथेचा ग्राफ बदलण्यात आला आहे. कथेच्या मूळ गाभ्याला कुठेही धक्का लावला नसल्याचं दिग्दर्शक अनंत अंकुशचं म्हणणं आहे. तेंडुलकरांच्या कथेचं शीर्षक आणि संहिता तंतोतंत जुळणारी असल्याने शीर्षकही तेच ठेवल्याचंही अनंत म्हणाला.


हलकंफुलक सादरीकरण

‘तेव्हाच ठरलं होतं’, ‘कलंक छाया’ आणि ‘आली तर पळापळ’ या नाटकांची निर्मिती करणारी स्मितहरी प्रोडक्शन ही निर्मिती संस्था माई प्रोडक्शनच्या साथीने या नाटकाची निर्मिती करणार आहे. संकल्प थिएटर प्रकाशित हे नाटक प्रविण धोपट यांनी लिहिलं आहे. स्मिता हरी पाटणकर, संतोष मयेकर आणि योगेश लोहकरे या नाटकाचे निर्माते आहेत. निर्माते हरी पाटणकर यांच्या म्हणण्यानुसार या नाटकाचा विषय जरी गंभीर आणि अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा असला, तरी त्याचं हलकंफुलकं सादरीकरण आणि संवाद रसिकांना पोट धरून हसवणारे आहेत.



हेही वाचा -

EXCLUSIVE : ‘फरफ्युम’मध्ये ‘महेक’णार लोणावळयाची मोना!

जॉनी लिव्हर करणार ‘एक टप्पा आऊट’



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा