Advertisement

संपकाळात एसटी महामंडळाचे १,६०० कोटींचे नुकसान

शासनामध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या ३ महिन्यांहून अधिक काळ सुरू एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.

संपकाळात एसटी महामंडळाचे १,६०० कोटींचे नुकसान
SHARES

शासनामध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या ३ महिन्यांहून अधिक काळ सुरू एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. विशेष म्हणजे या संपकाळात एसटीचे १,६०० कोटींचे प्रवासी उत्पन्न बुडाल्याची माहिती समोर येत आहे.

संपावर तोडगा काढण्यात एसटी महामंडळाला यश आलेले नसून, मंगळवार, २२ फेब्रुवारीला उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी २८ ऑक्टोबर २०२१ पासून कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने एसटी सेवा बंद झाली. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी आगारातून खासगी बसगाड्या, शालेय बस आणि वडाप वाहतुकीला परवानगी देण्यात आली.

संप चिघळल्याने प्रवाशांचे हाल सुरूच राहिले आणि एसटीचे नुकसान वाढतच गेले. नोव्हेंबर २०२१ पर्यंत संपामुळे एसटीचे ४३९ कोटी रुपयांचे प्रवासी उत्पन्न बुडाले होते. त्यात आणखी वाढ झाली असून, ते १ हजार ६०० कोटी २५ लाखांपर्यंत पोहोचल्याची माहिती मिळते.

एसटीच्या दररोज १० हजारांहून अधिक फेऱ्या होत असून, रोजची प्रवासी संख्या ७ लाखांहून अधिक आहे. त्यातून ४ कोटी रुपये उत्पन्न मिळत आहे. मोठ्या प्रमाणात चालक, वाहक अद्यापही संपात सहभागी असल्यानं एसटीची धाव अपुरीच आहे.

ग्रामीण भागात एसटीच नसल्यानं रिक्षा किंवा खासगी वाहतुकीवरच प्रवाशांना अवलंबून राहावं लागत आहे. वाहतूक काही प्रमाणात सुरळीत करण्यासाठी महामंडळानं खासगी चालक, वाहकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात १,६०० हून अधिक चालकांची भरती करण्यात आली. खासगी वाहकांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

एसटीचे एकूण ८२ हजार ४८९ कर्मचारी असून, यातील ५४ हजार ३९६ कर्मचारी अद्यापही संपात आहे. २८ हजार ९३ कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले आहेत.

४ हजार ५८२ चालक आणि ४ हजार ६९८ वाहक कर्तव्यावर असून प्रशासकीय व कार्यशाळेतील कर्मचारीही कामावर रुजू झाले आहेत. मात्र २५ हजार चालक आणि २० हजार २१२ वाहक संपात असल्याने एसटी पूर्णपणे धावू शकलेल्या नाहीत.

एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरूच असून, निलंबित कर्मचारी संख्या ११ हजार २४ आहे. १० हजार ३६२ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, आतापर्यंत ९ हजार २५१ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा