उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गाड्यांना मोठी गर्दी असते. शिवाय, आरक्षित तिकीट मिळतानाही प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. यामुळेच तिकीट दलालांच्या व्यवसायाला उधाण येतं. पण, आता असं होऊ नये, म्हणून मध्य रेल्वेकडून खास तयारी करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेने ‘तत्काळ’ तिकिटांच्या रांगांवर सीसीटीव्ही रोखण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच, रांगांमध्ये वारंवार उभं राहणाऱ्यांना ओळखण्यासाठी स्वतंत्रपणे व्हिडिओ शूटिंग करून तिकीट दलालांना पकडलं जाणार आहे. गेल्या आठवड्यात रेल्वे सुरक्षा बलाला अशा १४ दलालांना पकडण्यात यश आलं आहे.
मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्यांना मागणी असल्याने होणारी चेंगराचेंगरी आणि गर्दी टाळण्यासाठी यंदा मध्य रेल्वेच्या वाणिज्य प्रबंधकांनी १४ महत्त्वाच्या गाड्यांचे उतरण्याचे प्लॅटफॉर्म बदलले होते. त्यामुळे एकाच प्लॅटफॉर्मवर लागोपाठ येणाऱ्या गाड्यांमुळे होणारी कोंडी टाळण्यात यश आलं होतं. तसंच, अनारक्षित प्रवाशांना कूपन्स देऊन त्यांना गाडीत रांगेने बसवण्यात आलं होतं.
‘तत्काळ’च्या तिकिटांसाठी पहाटे ४ वाजल्यापासून रांगा लागत असतात. अशा रांगांमध्ये वारंवार येणाऱ्या चेहऱ्यांना ओळखण्यासाठी सीसीटीव्हीची दिशा वळवून रांगांवरही लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. शिवाय, आरपीएफमार्फत रांगांचे स्वतंत्रपणे शूटिंग करण्याचा प्रयोग सुरू आहे. त्यामुळे तिकीट दलालांना ओळखणं होपं होणार असल्याचं मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक सुनीलकुमार जैन यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा
मध्य रेल्वेचा विक्रम, एप्रिल महिन्यात फुकट्यांकडून ११ कोटी दंड वसूल