मुंबईची लाइफलाइन समजली जाणारी लोकल ट्रेन सेवा कधी सुरू होणार याकडे तमाम प्रवाशांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. त्यातच धीर सुटलेल्या विरारमधील प्रवाशांनी उपनगरीय लोकल सेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी सोमवार ७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास रेल्वे स्थानक परिसरात जोरदार आंदोलन केलं.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून लोकल ट्रेनची सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद ठेवण्यात आलेली आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच लोकल ट्रेनने प्रवास करण्यास मुभा आहे. सरकारने वेळोवेळी निर्णय घेत विविध आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी रेल्वे प्रवासाची सोय उपलब्ध करून दिली आहे. परंतु सर्वसामान्य प्रवासी मात्र लोकल ट्रेनमधून प्रवास कधी करायला मिळणार याच प्रतिक्षेत आहे.
राज्य सरकारने मिशन बिगीन अगेन म्हणत काही अटी-शर्थींच्या आधारे उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. जिल्हांतर्गत प्रवासाची अट देखील काढून टाकण्यात आलेली आहे. बेस्ट बस, एसटी बस, टॅक्सी-रिक्षा, ओला-उबर, खासगी वाहनांना देखील प्रवासाला परवानगी दिली आहे. त्यामुळे ज्या प्रवाशांना शक्य आहे, ते सगळेजण आपापले पर्याय निवडून उद्योगधंदा, आॅफिस गाठत आहेत. परंतु दूरवरून प्रवास करणारे, आर्थिक मर्यादा असलेल्या असंख्य प्रवाशांची लोकल ट्रेन सुरू नसल्याने अडचण होत आहे.
हेही वाचा- मुंबईतील लोकल ट्रेन, कार्यालयं १ नोव्हेंबरपासून सुरू करा, महापालिकेकडे अहवाल सादर
At Virar station, there is lathi charge due to lot of crowd at ST depot .. People gathered together due to closed ST services pic.twitter.com/2JCPludfka
— QueenBee (@VaidehiTaman) September 7, 2020
एसटी किंवा बेस्ट बसच्या प्रवासाला वेळ लागत आहे, रस्त्यांवर प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. खासगी वाहनाने प्रवास करताना इंधनासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. अशा असंख्य कारणांनी त्रस्त झालेल्या विरारमधील प्रवाशांच्या सहनशीलतेचा सोमवारी उद्रेक झाला. सकाळी ११ वाजता हजारो प्रवासी उपनगरीय रेल्वे लोकल सेवा सुरू करा, अशी मागणी करत विरार रेल्वे स्थानक परिसरात जमा झाले तर काहीजण रेल्वे रुळावर देखील उतरले. प्रवाशांचं हे उत्स्फूर्त आंदोलन होतं.
एसटी, बेस्ट बसची संख्या कमी असल्याने रांगेत तिष्ठत उभं राहावं लागतं. महामार्गाला वळसा घालून मुंबईत यावं लागतं. वाहतूककोंडी आणि प्रवासाला लागणारा वेळ यामुळे कार्यालयात वेळेवर पोहोचता येत नाही. यामुळे अनेकांचा पगार कापला जातो. घरी पोहोचायलाही उशीर होतो. त्यातच बसमधील गर्दीमुळे कोरोना संसर्गाचाही धोका असतो, अशा असंख्य व्यथा उपस्थित प्रवाशांनी सांगितल्या. काही दिवसांपूर्वी याच कारणामुळे नालासोपारा रेल्वे स्थानकावरही प्रवाशांनी आंदोलन केलं होतं. त्यानंतर तेथी एसटी बसच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या होत्या.
अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत प्रवाशांची समजूत घालून गर्दी पांगवली.