कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत अत्यावश्यक सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता बंद करण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी १ जूनपासून करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई, ठाणे, पालघर एसटी विभागाकडून पोलीस, पालिका कर्मचारी, मंत्रालय कर्मचारी, डॉक्टर, परिचारीका इत्यादी अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी एसटी सेवा चालवण्यात येत होती. त्यावेळी या कर्मचाऱ्यांना दररोज ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय महामंडळानं घेतला होता.
एप्रिल, मे महिन्यात भत्ता दिल्यानंतर १ जूनपासून मात्र कर्मचाऱ्यांना भत्ता मिळालेला नाही. एसटीची नुकतीच तालुका ते तालुका व गाव अशी सेवा सुरू झाली. या प्रवासाला फारसा प्रतिसाद नाही. तर राज्यांतर्गत प्रवास अद्यापही सुरू झालेला नाही. त्यामुळं लॉकडाऊनपूर्वी दिवसाला मिळत असलेले २२ कोटी रुपये उत्पन्न आता बंद झाले आहे.
एसटी मंहामंडळाचा संचित तोटा वाढत असून तो ६ हजार कोटीपर्यंत पोहोचला आहे. परिणामी ७ तारखेपर्यंत होणारे वेतनही उशिरानं होऊ लागले. आर्थिक कोंडी होत असल्यानं मुंबई परिसरात अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा प्रोत्साहन भत्ता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याची महामंडळाकडून लवकरच घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
हेही वाचा -
Shiv Sena Bhavan: शिवसेना भवनातही कोरोनाचा शिरकाव; काही दिवसांसाठी सेना भवन सील
जुलैच्या मध्यापर्यंत कोरोना पूर्णपणे नियंत्रणात- महापालिका आयुक्त