लोकल, बेस्ट, एसटी बंद असताना अधिकाधिक कर्मचारी कामावर येणार कसे, असा सवाल करत प्रशासनाच्या कारवाईचा निषेध केला आहे. आधी वाहतूक सेवा सुरू करा, कामगार येण्यास तयार आहेतच, असं आवाहन कामगार संघटनांनी महापालिकेला केलं आहे.
कोरोनाच्या संकटात काम करण्यासाठी अधिक मनुष्यबळ आवश्यक असताना अनेक कर्मचारी गैरहजर राहत आहेत. या कर्मचाऱ्यांना ७२ तासांची नोटीस देऊन बडतर्फ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर कामगार संघटनांनी आयुक्तांना पत्र पाठवून कामगारांच्या समस्या मांडल्या आहेत.
'लॉकडाउन जाहीर झाल्याच्या २३ मार्चपासून महापालिका कामगार, कर्मचाऱ्यांसाठी पुरेशा प्रमाणात वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, रेल्वे कर्मचाऱ्यांप्रमाणे महापालिका कामगार, कर्मचाऱ्यांना लोकलची सुविधा उपलब्ध करावी, ही मागणी कामगार संघटना सातत्याने करत आहेत. परंतु सोय उपलब्ध करून देण्यास प्रशासन संपूर्णतः अपयशी ठरले आहे.
महापालिकेचे कामगार, कर्मचारी हे पालघर, बोईसर, डहाणू, कर्जत-कसारा-खोपोली आणि पनवेलपर्यंत वास्तव्यास असून, तेथून त्यांना कामाच्या ठिकाणी यावे लागते. त्यांना रेल्वे स्थानकात यायला बेस्ट आणि एसटीशिवाय दुसरा पर्याय नाही. ही वस्तुस्थिती असताना आयुक्त धमक्या देत आहेत. हे बेकायदेशीर आहे, असे दि म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी पत्रात नमूद केले आहे.
कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची वैद्यकीय चाचणी देखील केली जात नाही. त्यामुळं कामगार, कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, असुरक्षिततेची भावना पसरली आहे. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी, समुपदेशनाची नितांत आवश्यकता असून प्रशासनानं काहीही केलेलं नसल्याच युनियनचं म्हणण आहे.
हेही वाचा -
मौज मजेसाठी रुम न दिल्याच्या रागातून कुख्यात गुंडाने हॉटेलमध्ये फेकला पेट्रोल बॉम्ब
Coronavirus Pandemic: मुंबईत 1150 नवे रुग्ण, दिवसभरात 53 जणांचा मृत्यू