कधी रेल्वे ट्रॅकला तडा जाणं, तर कधी ओव्हरहेड वायरच्या तुटण्यानं वेळापत्रक कोलमडणं, गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या लोकलट्रेनमध्ये स्वत:ला झोकून देण्यापलिकडे मुंबईकर प्रवाशांपुढे सध्र्या दुसरा पर्यायच नाही. चर्चगेट-विरार दरम्यानचा रखडलेला एलिव्हेडेड काॅरिडाॅर, ठाणे-सीएसटीएम दरम्यानच्या प्रस्तावित पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या खोळंबण्यामुळे उपनगरीय लोकलसेवा बेजार झालेली असताना केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी ५१ कोटी रुपयांची तरतूद करत मुंबईच्या 'लाईफलाईन'ला तारण्याचा प्रयत्न केला आहे.
अर्थसंकल्पात रेल्वेला मिळालेल्या एकूण १ लाख ४८ हजार कोटी रुपयांपैकी एकट्या मुंबईच्या 'लाईफलाईन'साठी ५१ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ज्यात मुंबई रेल्वेच्या विकासासाठी ४० हजार कोटी रुपयांच्या तरतूदीसोबत रेल्वे ट्रॅकच्या विस्तारीकरणासाठी ११ हजार कोटी रुपयांच्या अतिरिक्त तरतूदीचा समावेश आहे.
रेल्वेला देण्यात आलेल्या निधीचा मोठा भाग ट्रॅक, गेज याच्या कामांकरीता खर्च करण्यात येणार आहे. सर्व भारतीय रेल्वे नेटवर्क ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे. तर ३६०० कि.मी. पर्यंत रेल्वे मार्गाचं नूतनीकरण करण्यात येणार आहे.
मुंबईला मिळालेल्या निधीतून ११ हजार कोटी खर्च करुन ९० किमीच्या रेल्वे ट्रॅकच्या दुहेरीकरणाचं काम करण्यात येणार आहे. तर १६० रेल्वे ट्रॅकचं विस्तारीकरण करण्यात येणार आहे. सर्व स्टेशन्सवर सरकते जिने, सीसीटिव्ही कॅमेरा आणि वायफाय सुविधा देण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी झालेल्या दुर्घटनेतून धडा घेत रेल्वे प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने चांगले निर्णय घेतले आहेत. याच पार्श्वभूमीवर यंदा सादर झालेला अर्थसंकल्प मुंबईकरांच्या दृष्टीनेही फार महत्त्वाचा असणार आहे. कारण पहिल्यांदाच मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या विकासासाठी ४० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच ११ हजार कोटी रुपये ट्रॅक दुहेरीकरणासाठी देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या वर्षात रेल्वेचं मजबुतीकरण होऊन प्रवाशांना चांगली सुविधा मिळण्यासाठी मदत होणार आहे.
- सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघटना