मुंबईची लाईफलाईन असलेल्या मुंबईच्या लोकल (Mumbai Local) ने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण त्या तुलनेत लोकलच्या फेऱ्या कमी होत आहेत. त्यामुळे लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी केली जात आहे. याबाबत आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांनीही आपली भूमिका मांडत रेल्वेला जाहीर इशारा दिला आहे.
एसी लोकलच्या फेऱ्यांपेक्षा साध्या लोकलच्या फेऱ्या वाढवा अशी मागणी जितेंद्र आव्हाडांनी केली आहे. तसेच मागण्या मान्य न केल्यास रेलरोको आंदोलन करावं लागेल असंही आव्हाड म्हणाले आहेत.
लोकांचा उद्रेक होतोय. न सांगता, न बोलवता सुद्धा लोक आंदोलनात उतरत आहेत. हे गांभीर्याने घ्या. मी कालच सांगितले हा टाईम बॉम्ब आहे. मुंबईचे जीवनमान रेल्वेवर चालते हे विसरू नका. @GM_CRly @Central_Railway #kalwa #mumbra pic.twitter.com/SmQFqMFTus
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 22, 2022
जितेंद्र आव्हाड हे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, सर्वसामान्य माणसांचा विचार न करणाऱ्या रेल्वेच्या नवीन धोरणांचा अभ्यास करा. साध्या लोकल कमी करून AC लोकल वाढवण्याचा अर्थ काय? AC लोकल सर्वसामान्य कष्टकऱ्यांना परवडेल का? त्यापेक्षा साध्या लोकल वाढवा. त्यांची Frequency वाढवा. हेच या समस्येवर उत्तर आहे.
पुढे ते म्हणाले की, तसेच मुंब्रा व कळव्याच्या रेल्वे प्रवाशांना Frequency मुळे प्रचंड त्रासला सामोरे जावे लागत आहे. जेवढ्या ट्रेन येतात त्या सगळ्या भरून येतात ट्रेन मध्ये चढता देखील येतं नाही. मुंब्रा/कळव्याला 3 रा व 4 था प्लॅटफॉर्म बांधण्यात आला आहे. पण त्याचा फायदा कुणालाच होत नाही.
त्याचप्रमाणे गाड्यांची Frequency कमी झाली आहे. यावरती लवकरात लवकर लक्ष देण्याची गरज आहे. अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. या सगळ्या समस्यांकडे लक्ष द्यावे अन्यथा आम्हांला आंदोलनाचा मार्ग मोकळा असेल असा इशाराही आव्हाडांनी दिला आहे.
जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, मुंबईत गुरुवारी सकाळी आणि सोमवारी सकाळी कळवा रेल्वे स्थानकावर लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडली. रेल्वेची फ्रिक्वेन्सी कमी आहे. कळवा ते सीएसएमटी एसी लोकलचा पास २ हजार रुपये आहे. AC लोकलची संख्या वाढवली जात आहे, जी न परवडणारी आहे. तुम्हाला प्लॅटफॉर्म वापरायचे नव्हते तर घातले कशाला. हा उद्रेक कुठल्याही क्षणी बाहेर पडेल. २०० रुपयाला १ दिवसाचे तिकिट आहे साध्या लोकलचा महिनाभराचा पास २१५ रुपयाला आहे कुणाला परवडेल? तसेच मागच्या तीन महिन्यात १८० मृत्यूमुखी पडलेत हे योग्य नाही, यावर उपाय करा, लोकलच्या फेऱ्या वाढवा असंही आव्हाड म्हणाले आहेत.
तीन दिवसांपूर्वीच कळवा रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांनी लोकल रोखत आंदोलन केले होते. कारशेडमधून निघणाऱ्या लोकलला एसी लोकलमध्ये बदलल्याने प्रवाशांनी हे आंदोनल केलं होतं. एसी लोकल ही साध्या लोकलपेक्षा खूपच महागडी असल्याने एसी लोकलचे तिकीटही महाग आहे. यामुळे सर्वसामान्यांना एसी लोकलने प्रवास करणं परवडत नाही. अशात एसी लोकलच्या फेऱ्या वाढवल्याने साध्या लोकलच्या फेऱ्या कमी झाल्या आहेत.
हेही वाचा