एसटी महामंडळाच्या आर्थिक समस्या आता लवकरचं कमी होणार आहेत. कारण, राज्य सरकारनं विविध प्रवासी सवलतीमुळे येणे असलेली ६०७ कोटी रुपयांची शेवटची थकबाकी रोखीनं देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांचा पगार, इंधन आणि अन्य खर्चाच्या समस्यांना समोरे जावं लागणार नाही.
शालेय, कॉलेज विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक आदी वेगवेगळ्या घटकांच्या प्रवाशांना एसटी महामंडळाकडून तिकिटांमध्ये सवलत दिली जाते. तसंच यामधील तफावत राज्य सरकारकडून महामंडळाला दिली जाते. याच रकमेची सरकारकडे ६०७ कोटी रुपयांची अंतिम थकबाकी होती. त्यामुळे राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला थकबाकीतील रक्कम टप्प्याटप्प्याने देण्यात आली. मात्र आता शेवटची ६०७ कोटी रुपयांची रक्कम शिल्लक राहिली होती. ही रक्कम राज्य सरकार लवकरच महामंडळाच्या खात्यात जमा करणार आहे.
ही रक्कम महामंडळाच्या खात्यात जमा होणार असल्यानं बरेचसे प्रश्न सुटणार आहेत. राज्य सरकारकडून सवलतीची रक्कम आल्यास आर्थिक अडचणींवर मात करणे सोपं जाईल. याचबरोबर महामंडळाने अधिकारी, कर्मचाऱ्यांना बोनस, थकबाकी यांसारख्या अनेक गोष्टीची तरतुद केली असल्यामुळे ही रक्कम मिळाल्यास महामंडळाला दिलासा मिळणार आहे.