मुंबईतील अनेक जण दररोज आपल्या विविध कामांसाठी टॅक्सीनं प्रवास करत असतात. टॅक्सीचं भाडं २२ रुपये असल्यानं प्रवासी प्रवासासाठी टॅक्सीचा पर्याय निवडतात. मात्र, येत्या काही दिवसांत मुंबईकरांना टॅक्सीच्या प्रवासासाठी २२ रुपयांऐवजी ३० रुपये मोजावे लागण्याची शक्यात आहे. कारण, सीएनजीच्या दरात वाढ झाल्यानं दीड किलोमीटरमागे २२ रुपयांऐवजी किमान ३० रुपये करावी अशी मागणी मुंबई टॅक्सीमेन्स युनियननं परिवहन विभागाकडं केली आहे.
सीएनजीच्या दरात वाढ झाल्यानं दीड किलोमीटरमागे भाडं २२ रुपयांऐवजी किमान ३० रुपये करण्याबाबत मुंबई टॅक्सीमेन्स युनियननं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना पत्र पाठवलं असून, भाडेवाढ न मिळाल्यास संपाचाही इशारा दिला आहे. त्याशिवाय, १५ दिवसांची नोटीस देखील देण्यात आल्याचं संघटनेनं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. त्यामुळं येत्या काही दिवसांमध्ये मुंबईकरांवर टॅक्सी भाववाढीचं संकट येण्याची शक्यता आहे.
काही महिन्यांपूर्वी टॅक्सी संघटनेनं परिवहन मंत्र्यांकडं किमान भाडं २२ रुपयांवरुन २५ रुपये करण्याची मागणी केली होती. मात्र, सरकारकडून यावर कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आला नाही. तसंच, मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार २०१५ साली टॅक्सीचं किमान भाडं २१ रुपयांवरुन २२ रुपये करण्यात आलं होतं. त्यानंतर सीएनजीच्या भाड्यामध्ये किमान ५ वेळा वाढ करण्यात आली.
युनियनच्या या पत्रात इतर सर्व खर्चांमुळं टॅक्सी चालवणं सध्या जिकरीचं होऊन बसल्याचं म्हटलं आहे. टॅक्सी भाववाढीवर बसवण्यात आलेल्या खातुआ समितीनं देखील राज्य सरकारला प्रत्येक किलोमीटरमागं १ रुपये या दरानं टॅक्सीचं दर पुन्हा एकदा जाहीर करण्याचा पर्याय सुचवला होता. मात्र, सरकारनं या अहवालावर अद्याप कोणतही पाऊल उचललेलं नाही.
हेही वाचा -
राष्ट्रवादीचं स्वतंत्र अस्तित्व, काँग्रेसमध्ये विलिनीकरण अशक्य - शरद पवार