मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सुरू केलेल्या 'ठाणे - भिवंडी - कल्याण मेट्रो 5' मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील कामाचा एक महत्त्वाचा टप्पा अखेर पूर्ण झाला आहे. ठाणे-भिवंडी या पहिल्या टप्प्यातील सर्व स्थानकांच्या स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता स्टेशन आणि ट्रॅक टाकण्याचे अंतिम काम सुरू करण्यात येणार आहे.
मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी MMRDA ने 24.90 किमी लांबीच्या ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो 5 मार्गावर काम सुरू केले आहे. या मार्गाचे काम दोन टप्प्यात करण्यात येत आहे.
पहिला टप्पा ठाणे-भिवंडी आणि दुसरा टप्पा भिवंडी-कल्याण असा आहे. पहिल्या टप्प्याचे काम सध्या सुरू असून दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होणे बाकी आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील एकूण 81.55 टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे.
सहा मेट्रो स्टेशनचे 76.93 टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याच बरोबर वायडक्टचे 82.63 टक्के काम पूर्ण झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे, सहा स्थानकांचे स्लॅबचे काम पूर्ण करून एमएमआरडीएने आपल्या कामातील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला आहे.
पहिल्या टप्प्यात बाळकुम नाका, कशेळी, काल्हेर, पूर्णा, अंजूरफाटा आणि धामणकर नाका या सहा स्थानकांचा समावेश आहे. या सहा स्थानकांच्या स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे. आता फ्लोअरिंग, फॉल्स सीलिंग अशी कामे सुरू होणार आहेत. यासोबतच ट्रॅक आणि विविध यंत्रणांचे कामही सुरू होणार आहे.
हेही वाचा