रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुविधा देण्यासाठी रेल्वे प्रशासन नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असते. मात्र रेल्वेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खाद्यपानाची सेवा पुरवण्याची जबाबदारी आयआरसीटीसीवर सोपवण्यात आली आहे. सध्या देशात 8 विभागांमध्ये आयआरसीटीसी कार्यरत आहे.
पूर्वी संपूर्ण देशातील मेल-एक्स्प्रेसच्या प्रवाशांना खाद्य पुरवठा करण्याचे कंत्राट आयआरसीटीसीकडे होते. परंतु काही वर्षापूर्वी रेल्वे प्रशासनाने आयआरसीटीसीकडून खाद्य पुरवठ्याचे कंत्राट काढून ते स्वता:कडे घेतले.
परंतु, त्यामध्ये अनेक तांत्रिक समस्या आणि प्रवाशांकडून आलेल्या तक्रारींमुळे केटरिंग धोरणाची घोषणा रेल्वे मंत्रालयाने केली. त्या नव्या धोरणानुसार आयआरसीटीच्या स्थानिक खानावळी (बेस किचन) मध्ये जेवण तयार केले जाईल आणि ते रेल्वे प्रवाशांपर्यंत पोहोचवले जाईल. या नव्या धोरणानुसार रेल्वेमध्ये जेवण पोहोचविण्याचे कंत्राट खासगी कंपन्यांना देणे बंद करण्यात आले आहे.सध्या आयआरसीटीसीच्या दिल्ली येथील नोएडा विभागामध्ये बेस किचन आहे. नोएडा येथील बेस किचन अद्ययावत असून, येथील सर्व सामग्री आधुनिक आहे. या बेस किचनमध्ये दिवसाला 7 हजार 500 लोकांसाठी जेवण तयार करण्यात येतं.
सध्या 7 मेल-एक्स्प्रेसमधील प्रवाशांना खाद्य पुरविण्याचे काम आयआरसीटीसी करीत आहे. नोएडा येथील बेस किचन दोन विभागांमध्ये विभागलं गेलं आहे. आयआरसीटीसीच्या बेस किचनमध्ये 25 हजार लोकांसाठी जेवण बनविण्याची क्षमता आहे. नोएडा येथील बेस किचन सोबतच दिल्ली, हावडा, पटना आणि अहमदाबाद येथे देखील मिनी बेस किचन सेवा सुरू करण्यात आलेली आहेत. रेल्वे मंत्र्यांनी यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये जाहीर केल्याप्रमाणे आता संपूर्ण देशातील मेल-एक्स्प्रेसमधील प्रवाशांना खानपानची सेवा पुरविण्याचे काम आयआरसीटीसी करणार आहे.