एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना राज्यभरात गतिमान आणि आरामदायी प्रवासाची सुविधा मिळावी, यासाठी राज्य परिवहन महामंडळानं मागील ३ वर्षांपूर्वी शिवशाही बसची सेवा सुरू केली. परंतु, सेवेमध्ये महामंडळाच्या मालकीच्या गाड्यांपेक्षा खासगी गाड्यांची संख्या जास्त आहे. या शिवशाहीवरील चित्र आणि बसची रचना लग्झरी बस सारखी असल्यानं या बसला प्रवाशांनी सुरूवातीला चांगला प्रतिसाद दिला. या बसमधून प्रवाशांना आरमदायी प्रवास करता येत होता. मात्र, खासगी मालकीच्या शिवशाहीवरील चालकांना प्रशिक्षण नसल्यानं मोठ्या प्रमाणात अपघातांची संख्या वाढली. अपघातांची वाढल्यानं प्रवासी संख्याही प्रचंड कमी झाली, व प्रवाशांनी महामंडळाच्या मालकीच्या एसटी बसनं प्रवास करणं पसंत केलं आहे.
एसटी महामंडळात दाखल झालेल्या वातानुकूलित शिवशाही बसचे एप्रिल २०१९ ते सप्टेंबर २०१९ या ६ महिन्यांत २२१ अपघात झाले आहेत. यामधील ७४ अपघातांमध्ये प्रवाशांचा मृत्यू तसंच प्रवासी जखमी झाल्याची नोंद आहे. मात्र, या अपघातांचं गांभीर्य आणि ते रोखण्याकरीता नियोजन करण्यासाठी एसटीच्या सर्वच चालकांचा प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहे. दरम्यान, एसटी महामंडळानं खासगी प्रवासी वाहतूकदारांनी निर्माण केलेल्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी जून २०१७मध्ये वातानुकूलित शिवशाही बस ताफ्यात दाखल केली. स्वत:च्या मालकीच्या आणि भाडेतत्त्वावर शिवशाही बस टप्प्याटप्यांमध्ये एसटीत दाखल करण्यात आल्या.
शिवशाही बसमधून प्रवाशांना आरमदायी प्रवास करता येत असला तरी, वाढत्या अपघातांमुळं सतत चर्चेत राहीली आहे. अप्रशिक्षित चालक, चालकांवरील कामाचा वाढता ताण, शिवशाहीवर महामंडळाचा नियंत्रणाचा अभाव, अनावश्यक गती, रस्त्यांची दुरवस्था, महामंडळाने केलेल्या उपाययोजना, चालकांसाठी भोसरी येथे प्रशिक्षण केंद्र, बसगाड्यांची नियमित तपासणी, लांबच्या प्रवासासाठी २ चालक, चालकांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी, चालकांचं प्रबोधन या कारणांमुळं शिवशाही बसचे अपघात होत असल्याचं म्हटलं जात आहे.
१ जून २०१७ ते २५ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत शिवशाहीचे राज्यभरात ५५० लहान-मोठे अपघात झाले आहेत. यामध्ये प्राणांतिक अपघातांची संख्या ५१ वर पोहचली असून, ३७१ गंभीर तर ११५ किरकोळ अपघात आहेत. एप्रिल २०१८ ते नोव्हेंबर २०१९ या कालावधीत एकूण ४४२ अपघात झाले असून, ४४ प्राणांतिक व ३०० गंभीर स्वरूपाचे अपघात झाले आहेत. अपघातांच्या एकूण संख्येचा विचार केल्यास ही सेवा सुरू झाल्यापासून दररोज सरासरी एक ते दोन अपघात झाल्याची माहिती मिळते.
एसटी महामंडळात साध्या, निमआराम, शिवनेरी यासह अन्य प्रकारच्या बस धावत आहेत. मात्र या बससेवांमधील शिवशाही बसच्या अपघातांची संख्या जास्त आहे. त्यामुळं या बसमध्ये प्रवासी सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं चित्र आहे. शिवशाहीचा प्रवास आरामदायी असला तरी प्रवाशांनी त्याकडं पाठ फिरवली आहे. या प्रकरणी अनेकदा एसटी महामंडळाकडून अपघातांची संख्या कमी झाल्याचं म्हटलं गेलं आहे. मात्र, प्रत्यक्षात तर अपघात होतच आहेत. त्यामुळं येत्या काळात एसटी महामंडळ प्रवासी सुरक्षा लक्षात घेत शिवशाही बसच्या अपघातांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करणार का हे पाहणं महत्वाची ठरणार आहे.
हेही वाचा -
PNB घोटाळा: नीरव मोदी फरार घोषित