एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर मुंबईतील पुलाचं स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचं आश्वासन मुंबई महानगरपालिकेचं असो वा रेल्वेचं, ही आश्वासनं हवेतच विरली आहेत. असं असताना आता रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मुंबई उपनगरातील सर्व प्रकारच्या पुलांचं थर्ड पार्टी सेफ्टी आॅडिट करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे. रेल्वे आणि पालिकेच्या मदतीनं आयआयटी मुंबईच्या माध्यमातून हे आॅडिट केलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
या दुर्घटनेची चौकशी रेल्वे सुरक्षा अायुक्तांच्या अध्यक्षतेखाली करण्याचे अादेश यावेळी रेल्वेमंत्र्यांनी दिले अाहेत. तर या चौकशीचा अहवाल १५ दिवसांत सादर होणे अपेक्षित अाहे.
मंगळवारच्या अंधेरी पुल दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्री दुपारी साडे चारच्या दरम्यान घटनास्थळी पोहचले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना रेल्वेमंत्र्यांनी आयआयटीच्या मदतीनं उपनगरातील ४४५ पुलांचं थर्ड पार्टी सेफ्टी आॅडिट करण्यात येणार असल्याचं सांगितलं. यात रेल्वे ओलांडणी पुल, रस्ते ओलांडणी पुल, पाईपलाईनवरील पुल अशा सर्वच प्रकारच्या पुलांचा समावेश असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. आयआयटी मुंबईचे संचालक देवांग कक्कड यांच्याकडे थर्ड पार्टी सेफ्टी आॅडिट करण्यासंबंधी विनंती करण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी ती मान्य केली आहे.
पुढच्या सहा महिन्यात पालिका, रेल्वे आणि इतर संबंधित यंत्रणांच्या मदतीनं आयआयटी या ४४५ पुलांचं सेफ्टी आॅडिट पूर्ण करत त्याचा अहवाल रेल्वे मंत्रालयाकडे सादर करेल. या अहवालानुसार पुढे पुलांच्या दुरूस्तीचा वा नव्यानं बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंगळवारी कोसळलेल्या पुलाचं आॅडिट नोव्हेबर २०१७ झालं होतं आणि त्यात हा पुल सुरक्षित दाखवण्यात आल्याची कबुलीही यावेळी रेल्वेमंत्र्यांनी दिली आहे.
पुल सुरक्षित असतानाही कोसळल्यानं या आॅडिटबाबत शंका उपस्थित होत असताना रेल्वेमंत्र्यांनी मात्र वेळ मारून नेली आहे. रेल्वे ओलांडणी, पादचारी पुलाचं आॅडिट करण्यासाठी गाड्या, पादचाऱ्यांची वर्दळ, रेल्वे सेवा आणि वीज खंडित करावी लागते. अशा प्रकारचे आॅडिट झालं तरच ते योग्य प्रकारे होतं. पण मुंबईत दिवसा अशाप्रकारे आॅडिट करणं शक्य होत नसल्यानं आतापर्यंत झालेलं आॅडिट योग्य प्रकारे होत नसल्याचं म्हणत रेल्वेमंत्र्यांनी वेळ मारून नेली आहे.
आयआयटीकडूनही रात्रीच्या वेळेस सेफ्टी आॅडिट होणार आहे. पण हे थर्ड पार्टी आॅडिट असल्यानं आणि त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींकडून होणार असल्यानं ते अचूक होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, चार वर्षात केंद्र सरकारसह राज्य सरकारनं रेल्वे क्षेत्रात खूप चांगलं काम केलं असून मुंबईकरांच्या सुरक्षेवर नेहमीच भर दिल्याचं सांगायलाही ते यावेळी विसरले नाहीत. तर ही दुर्घटना दुर्देवी आणि गंभीर असल्याचं म्हणत त्याच राजकारण न करण्याचा सल्लाही विरोधकांना दिला आहे.
हेही वाचा -
अंधेरी पूल दुर्घटना : बेस्ट, मेट्रो ठरली प्रवाशांची तारणहार
तब्बल सात तासांनंतर हार्बर सेवा सुरू